नवी दिल्ली : आगामी आर्थिक वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रांकडे विशेष भर देण्यात आला असून सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामधून काय महागलं? काय स्वस्त झालं? जाणून घ्या सविस्तर…
काय स्वस्त ?
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधे आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये तशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यव्यवस्थेकडे विशेष भर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.
काय महाग?
त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोठे टीव्ही, बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. विशेषताः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत.
दरम्यान, या बजेटमध्ये स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून कर्जाची मर्यादा 10 कोटीवरून 20 कोटी करण्यात आली आहे. गॅरंटी फि सुद्धा कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केला आहे.