• Sat. Jul 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

ByEditor

Jul 25, 2026

नवी दिल्ली : मीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत गेल्या एका महिन्यापासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली आहे.

याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र, २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. असं असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात म्हटलं आहे की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.

परीक्षा रद्द करून नव्या तारखेला पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचंही ठरवण्यात आलं.
20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकारं, जिल्हा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे 21 जून रोजी परीक्षा यशस्वीरित्या घेता आल्याचं त्यांनी नमूद केलं.

परीक्षेत गैरप्रकार उघड झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण जबाबदारी स्वीकारली होती आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार केला होता, असंही प्रधान यांनी म्हटलं आहे. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब कुटुंबांतील अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

मात्र, या संपूर्ण काळात काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण व्यथित झाल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं. गेल्या दहा दिवसांतील घटनाक्रम पाहून मन दुःखी झालं असून हा प्रश्न आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पत्रात त्यांनी आंदोलनांचा थेट उल्लेख करत जंतर-मंतर आणि देशातील सध्याच्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर लढायांमध्ये अडकू नये, विद्यार्थ्यांनी आपला वेळ आंदोलनात न घालवता शिक्षण आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“भारताची युवा शक्ती ही देशाची खरी ताकद आहे. देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही,” असं सांगत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपण पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले असून भविष्यातही राष्ट्रसेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!