पुणे : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. पण आता त्या कधीही जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकला चलोच्या मुडमध्ये दिसत आहे. त्यातच आता दिल्लीत आपचा पराभव झाल्यानंतर शिवसेना मविआतूनच बाहेर पडण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य खासदार सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राज्यभर चर्चा सुरू झाल्या आहेत. ते पुण्यातील पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या आधी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस व आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तटकरे यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष तयारी करत आहे. आम्ही पक्ष बांधणी करत असून पक्ष वाढीसाठी राज्यभर जात आहोत. महायुतीतील घटक पक्ष म्हणून जबाबदारीचे भान ठेवत पक्ष विस्तार आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचाही महाराष्ट्राचा दौरा निश्चित केला जाणार आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे, तर मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी मागणी आहे. पण यावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते बैठक घेऊन निर्णय घेतील. एकत्रित की स्वबळावर लढायच्या हे त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अवलंबून असेल असे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.