दिवेआगर पर्यटन प्रवास बनला खडतर
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली वाकडा पुल ते दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळांशेजारी रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डेमय प्रवासाला कंटाळले आहेत.
तालुक्यातील पुणे, मुंबई या शहरातील येणाऱ्या वाहनांसाठी दिवेआगर अशा मुख्य पर्यटन स्थळाला खाडीलगत जोडणारा हा मार्ग सद्या खिळखिळा बनला आहे. पर्यटनाला गती मिळावी यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका आग्रही ठरत आहे. मात्र, इकडे रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांकडे अद्याप दुर्लक्ष आहे.
सद्यस्थितीत अपूर्ण डांबरीकरणामुळे दिवेआगर मार्गावरील टोकदार खड्डी बाहेर आली आहे. या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय पर्यटन दृष्टीकोनातून महत्वाचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने पर्यटक संताप व्यक्त करतात.
श्रीवर्धन म्हंटलं की, विस्तीर्ण समुद्र किनारा डोळ्या समोर येतो. त्यातच दिवेआगर समुद्रकिनारा सुरक्षेच्या दृष्टीने एकमेव बीच असल्याने पर्यटकांना आवर्जून पहावसं वाटतो. या मार्गावरील चार किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना जवळचा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ‘नको असले पर्यटन’ असे म्हणत पर्यटक संताप व्यक्त करतात. या चार किलोमीटरच्या अंतरावर पावलोपावली खड्डे दिसतात.
या अरूंद रस्त्यावरून वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पर्यटक व् नागरिकांना कित्येक वर्ष या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून व येथील ग्रामस्थांकडून होत आहे.