सलीम शेख
माणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील स्थानिक तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबीवली, सुरत स्थित चाकरमानी प्रवाशांना कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताना वर्षानुवर्षे अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नागरीक, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग दररोज कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल व इतर परिसरात ये-जा करत असतात. दक्षिण रायगड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, पर्यटन, धार्मिक स्थळे तसेच औद्योगिक प्रकल्प असल्यामुळे दक्षिण रायगड जिल्ह्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना लोकल मेमो रेल्वे सुरु करण्याची गरज आहे. तसेच या कोकणातून येणाऱ्या जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना माणगाव रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने गैरसोय होत आहे. लोकल मेमू व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने २५ हजार स्वाक्षऱ्यांची मोहीम ऑफलाईन व ऑनलाईन हाती घेतली आहे. या मोहिमेला मुंबई, सुरत तसेच कोकणातील प्रवाशांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्वाक्षरीसाठी प्रवासी, नागरिक स्वत: हात पुढे करीत आहेत. यामुळे या लोक चळवळीला अधिक गती मिळाली आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड या प्रमुख तालुक्यातून जात असला तरी या मार्गाचा फायदा स्थानिक तसेच चाकरमानी रायगडसह कोकणातील जनतेला होताना दिसत नाही. कर्नाटक, गोवा, तळकोकणातून येणाऱ्या गाड्या तुडुंब भरून येत असल्यामुळे माणगांव रेल्वेस्थानकावर स्थानिक प्रवाशांना प्रवेश करण्याची संधी सुध्दा मिळत नाही. या सर्व बाबींमुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. याच अनुषंगाने ‘पनवेल-माणगांव-वीर अशी डेली विशेष लोकल मैमु’ तातडीने सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी तसेच लांब पल्ल्याच्या महत्वाच्या रेल्वे गाड्यांना माणगाव रेल्वे स्थानकात थांबे मिळावे. द. रायगड जिल्ह्यातील इंदापूर, माणगांव, गोरेगांव, वीर, विन्हेरे व इतर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरीता कोकण रेल्वे प्रवासी संघटना, रायगड या संघटनेची ता. २ जुन २०२३ रोजी स्थापना करण्यात आली. अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे संयोजक विपुल उभारे यांनी दिली.
पनवेल-माणगांव-वीर अशी डेली विशेष लोकल मेमु तातडीने सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी व रेल्वे प्रवासादरम्यानच्या समस्या दूर व्हाव्या याकरीता कोकण रेल्वे प्रवासी संघटना, रायगड या संघटनेच्या पुढाकाराने दक्षिण रायगड जिल्ह्यातील हजारो स्थानिक व चाकरमानी नागरीक एकवटलेले आहेत. त्या बैठकीत सर्वानुमते स्थानिक व चाकरमानी नागरीक, प्रवासी यांच्या सोबतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रायगडकरांच्या मागण्यांसदर्भातील २५ हजार रायगडकरांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्रालय, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित यंत्रणांकडे देण्याचे नियोजित केले आहे. पनवेल-माणगांव-वीर ही विशेष लोकल मेमु सुरू झाल्यावर सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे प्रवासी नागरिक व चाकरमानी यांना आपल्या गावाकडील कुटुंबातील व्यक्तींशी गाठी भेटी घेणे सुलभ होणार आहे. तसेच अप-डाऊन करणे सहज शक्य होणार आहे. या लोकल मेमोमुळे कमी पैशात प्रवास होणार आहे. हे निवेदन संघटनेमार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व कोकण रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे.