अभय पाटील
बोर्ली पंचतन : बोर्ली पंचतन व दिवेआगर व्यापारी वर्गाकडून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. आजही नारळी पौर्णिमेच्या दिवशी दिवेआगर समुद्रकिनारी समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करण्यात आला.

पूर्वीच्या काळी दिवेआगर हे व्यापारी बंदर होते. विविध शहरातून समुद्र मार्गे मालाची ने-आण होत होती. त्यामुळे मोठ मोठी जहाजे सध्याच्या दिवेआगर ग्रामपंचायत समोरच्या बाजूला लागत असत. कालांतराने हा मार्ग नैसर्गिकरित्या भराव झाल्याने बंद झाला. परंतु, व्यापारी वर्गाची तेव्हापासून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ देण्याची परंपरा कायम आहे. आजही नारळी पौर्णिमेच्या दिवशी व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य, दिवेआगर येथील व्यापारी यांनी नारळाची पूजा करून समुद्राला अर्पण केला.