भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष जयवंत दळवी यांचा इशारा
मिलिंद माने
महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले ती पद्धत चुकीची आहे. आपण मंत्री असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची काय परिस्थिती होती? ती त्यांनी अवगत करून मगच आरोप करावे. अशी बेताल वक्तव्य पुन्हा करू नका अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे उपजिल्हाप्रमुख जयवंत दळवी यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या दुरवस्थेबाबत दोन दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत प्रतिक्रिया देताना दक्षिण रायगडचे भाजपा उपाध्यक्ष जयवंत दळवी म्हणाले की, रामदास कदम हे कोकणातील मोठे नेते आहेत, मात्र काही गोष्टी त्यांनी तपासल्या पाहिजेत. रामदास कदम ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची काय परिस्थिती होती ती त्यांनी अवगत करून घ्यायला हवी होती खरे तर त्यांना ती अवगत असावी.
शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. एवढा मोठा नेता असताना प्रगल्भ नेता असताना त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या त्यावेळच्या परिस्थितीचे अवलोकन केले नाही असे म्हणणे साफ चुकीचे आहे. परंतु, त्यांनी चव्हाण साहेबांवर जे बिनबुडाचे आरोप केले आहेत ते खऱ्या अर्थाने खूप वाईट आहे असे खेदाने म्हणावे लागते असे जयवंत दळवी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले. रामदास कदम तुम्ही सुद्धा या राज्याचे कोकणाचे फार मोठे मंत्री झालात, त्यावेळेला नेमके आपण कुठे चुकला किंवा आपली नेमकी कुठे चूक झाली याचे रामदास कदम यांनी खऱ्या अर्थाने सिंहावलोकन करावे. रामदास कदम ज्या पद्धतीने चव्हाण साहेबांवर बोलले ती पद्धत चुकीची आहे. तुमचा मी जवळून अभ्यास केला आहे, परंतु ते अशा पद्धतीने बोलतील असे मला कधी वाटले नव्हते. परंतु ते का बोलले याचे सिंहावलोकन त्यांना करावे लागेल. रवींद्र चव्हाण यांचे जे काम आहे आज भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा चव्हाण यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास टाकून स्वतःहून चव्हाणांची पाठ थोपटली आहे. एवढा मोठ्या मनाचा माणूस असावा लागतो. परंतु, रामदासभाई तुम्ही अशी चूक करू नका, काही गोष्टी चव्हाण साहेबांकडून तुम्हाला शिकायलाच पाहिजेत अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्यानंतर दक्षिण रायगड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी यांनी दिली आहे.