• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणचा आमदार आगरीच हवा -सुधाकर पाटील

ByEditor

Nov 19, 2024

प्रतिनिधी
उरण :
उरण विधानसभा क्षेत्रात आगरी-कोळी-कराडी समाजातील उमेदवारालाच मतदान करावे यासाठी सामाजिक पदाधिकारी सुधाकर पाटील व इतर मान्यवर प्रचार करत आहेत. आगरी समाज समुद्र किनारी वास्तव्य करून आहे. या समाजाच्या पूर्वजांनी, शेकडो वर्षांपूर्वी अपार मेहनत आणि कष्ट करून अक्षरशः समुद्र हटवला, मोठमोठे बांध घातले आणि भातशेती/जमीन निर्माण केली. इतर प्रांतियांचे यात शून्य योगदान आहे. याच जमिनीवर आजची नवी मुंबई, जेएनपीटी बंदर आणि इतर औद्योगिक प्रकल्प उभे आहेत.

महात्मा गांधींच्या आवाहनानुसार 1930 साली उरण येथील चिरनेर या गावी ऐतिहासिक जंगल सत्याग्रह झाला. ब्रिटिश सरकारने केलेल्या अमानुष गोळीबारात आठ हुतात्मे झाले. त्यातही उरण तालुक्यातील आगरी-कराडी-कोळी,न्हावी आणि आदिवासी भूमिपुत्र होते. परप्रांतियांचा त्यात सहभाग नव्हता. तसेच या समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी ब्रिटिश काळात सन 1932 ते 1939 दरम्यान तब्बल सात वर्षे सावकारशाही विरोधात शेतकरी संप केला. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यात सहभाग घेतला होता. हाच संप पुढे कुळ कायद्याच्या निर्मितीस कारणीभूत ठरला आणि महाराष्ट्रातील शेतकरी जमीनीचे मालक बनले. उलट येथील व्यापारी आणि सावकार शेतकऱ्यांचे शोषण करीत होते.

देशाच्या विकासासाठी याच समाजाने आपल्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असणाऱ्या पिकत्या जमिनी सरकारला अत्यल्प दराने अर्पण केल्या. आज त्यांच्याच जमिनीवर नवी मुंबईचे वैभव, जेएनपीटी बंदर आणि ईतर औद्योगिक प्रकल्प उभे आहेत. या त्यागापायी हा बहुतांश समाज भूमिहीन झाला आहे. परप्रांतियांचा यात त्याग नाही. नवी मुंबईसाठीच्या जमीन संपादनात शेतकऱ्यांना उचित मोबदला मिळावा म्हणून लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 चे रक्तरंजित आंदोलन झाले. त्यात पाच हुतात्मे झाले आणि तेही आगरी आणि कराडी समाजाचेच होते. याच ऐतिहासिक लढ्यातून शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या 12.5% विकसित भूखंड देण्याचे तत्व संपूर्ण देशात प्रस्थापित झाले. परप्रांतियांचा या लढ्यातही सहभाग नव्हता.

यामुळे आगरी-कोळी-कराडी समाजाचे येथील जडणघडणीत असलेले भरीव योगदान आणि त्यांची येथील सुमारे 90% लोकसंख्या लक्षात घेता याच समाजाचा आमदार असावा ही स्वाभाविक बाब आहे. यात व्यक्तिभेद, जातीभेद किंवा प्रांतभेद मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वस्तुतः भाजपने 1% लोकसंख्या असलेल्या समाजाला उमेदवारी दिल्यामुळे बहुसंख्याक आगरी-कोळी-कराडी समाजावर अन्याय केला आहे, किंबहुना, त्यांचा अवमान केलेला आहे. ही वस्तुस्थिती जाणून ईतर समाजातील मतदारांनीही आणि येथील सर्वपक्षीय मतदारांनी आगरी-कोळी-कराडी समाजाच्याच उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!