अनंत नारंगीकर
उरण : आपल्या विविध कामाकरिता सर्व सामान्य जनतेला शासकिय कार्यालय गाठावे लागते. परंतू कागदपत्राच्या अजाणतेपणामूळे येथे असलेले दलाल लहान-लहान कामांकरिता या लोकांना लक्ष्य करुन आर्थिक भुर्दंड देतात. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा सर्व प्रकार माहिती असतानाही अश्या दलालांवर अंकुश न लावताच अधिकारी-कर्मचारी आपल्या तोंडावर बोट ठेवतात. त्यांचे हे बोट ठेवण्या मागील काय कारण असावे? असा प्रश्न निर्माण होत असला तरी राज्य सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे मागील वर्षांपासून उरण तहसील कार्यालयात व इतर शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.
उरण तालुका हा तिसऱ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध कामे घेऊन येतात. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश असतो. कुठल्या तरी कामासाठी त्यांना दाखला हवा असतो, महसूल विभागात जमिनीच्या केसेस, ७/१२ दुरूस्ती, कुळ कायदा, फेरफार त्रुटी, वारस नोंदी नावे, क्षेत्र बदल, पोटखराबा नोंदी, जात पडताळणी करणे, आधार कार्ड, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सह इतर शासकीय योजनांसाठी एखादा कागद कमी असल्यास दाखल्याचा अर्ज त्रुटीमध्ये निघतो. याकरिता अधिकारी स्तरावर कुठलेही मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला आपला पैसा आणि वेळ खर्चून अनेक हेलपाटे मारावे लागतात. परंतु एखादा कागद कमी असलेला अर्ज दलाला मार्फत सादर झाल्यास विना त्रुटी तो पास होतो, हा अनेक सुज्ञ नागरिकांचा अनुभव आहे.

तहसील कार्यालयाबरोबर दुय्यम निबंधक, महावितरण, कृषी, वन, पंचायत समिती, उरण भूमी अभिलेख कार्यालयात तर अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचीच संख्या अधिक दिसते. कर्मचारी सापडणार नाही; पण दलाल मात्र संबंधित कार्यालयात व तहसिल कार्यालयाजवळ बेकायदेशीर बस्तान बसविलेल्या टपरी ठिकाणी हमखास मिळतो. या कार्यालयात कुठलेही काम दलाला शिवाय झाल्यास नशीबच समजावे लागेल. एवढी या कार्यालयात दलालांची वट आहे. काम कसे करून घ्यायचे याचा सल्ला दलालच देतात. परंतु, तो फुकट नसतो, हे सर्वश्रुतच आहे. एकंदरीत आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला शेतकरी, सर्वसामान्य जनता या कार्यालयात आपली विविध कामे घेऊन येतात. या कार्यालयात त्यांची अडवणूक होते. अशावेळी आपल्या खिशाला चाट देत त्यांना दलालांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची किड नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथील तहसील कार्यालयाबरोबर इतर शासकीय कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी सर्व सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
उरण तहसील कार्यालयात एकच अधिकृत सेतू केंद्र असताना अनेकांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने टपऱ्यांमधून आपला गोरखधंदा सुरू केला असून त्यातील दलालांची शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत उठबस वाढली आहे. शिवाय, त्यांच्यासोबत चहापाणी घेणे, नाश्ता, पार्टी करणे अशी त्यांची दीनचर्याही सुरू झाली आहे. हा प्रकार दलालांसाठी पोषक ठरत आहे. तरी सरकारमधील मंत्र्यांनी हे कुठे तरी थांबविणे गरजेचे आहे.
-एस. एम. पाटील
शेतकरी, उरण.
मी स्वतः अनुभव घेतोय..रेशन कार्ड अपडेट साठी सहा महिने वाट बघतोय..बाहेरच्या दलालांमार्फत गेल्यावर महिनाभरात काम होते. अपडेट करणारी मुलगी सरळ उलट उत्तरे देते. तक्रार केल्यानंतर रेशन दुकानदार आमचा पगार देतात तहसीलदार नाही असं सरळ सांगते.