गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तालुक्यातील नागरिकांना वाहनांमधून होडीच्या प्रवसाचा अनुभव येत असून अनेकांना पाठ, मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. गाव खेड्यातील रस्त्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याचे, तसेच राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत प्रशासनामध्ये उदासीनता दिसून येत आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून खडी मिश्रणाने रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. तर कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्डयामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र याबाबत एमएसआरडीए विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

याच कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे कर्जत येथे अनेक वर्षे रोलर भाडयाने देण्याचा व्यवसाय करणारे महमद हरुन (वय ४५) हे रविवार, दि. १० डिसेंबर रोजी रोलर ड्रायव्हर यांना कशेळे येथून कर्जत येथे घेऊन जात असताना, पेज नदी पुलाच्या पुढील आदिवासी वाडी पुलाचीवाडी येथील खड्ड्यात त्यांची मोटरसायकल आपटून त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. गाडीवरून पडल्याने हरुन यांच्या डोक्याला जबरी मार लागल्याने, त्यानां पंधरा दिवस हॉस्पिट्लमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची तब्येत जास्त खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आठ दिवस उपचार चालू असताना, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. खड्डे न बुजवल्याने हरुन कुटुंबीय यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. तर हरून यांच्या सारख्या निष्पाप वाहनचालकांना मृत्यूला सामोरे जाण्याच्या घटना घडल्या, परंतु गेंडयाची कातडी असलेल्या एमएमआरडीएचे अधिकारी यांचे रस्ता दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने, सदर अपघाता संदर्भात एमएसआरडीएच्या अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे येत आहे.

कर्जत-कशेळे-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासह या रस्त्यावर मध्यमागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन वित्तहानी व जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कशेळे-कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरून वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील अनेक गावांचा नित्याचा संपर्क आहे. तसेच हा रस्ता व्यवसायिक अवजड वाहनांना महामार्गाशी जोडण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. त्यामळे सदर रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुसाट सुरु असते. रस्त्यावर मध्यमागी पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, याबाबत एमएसआरडीए प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष होत असून संबधित प्रशासन गाढ झोपेत आहे. दरम्यान या मार्गावरील खड्डे चुकवताना मोठा अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमएसआरडीए विभाग राहणार असल्याच्या प्रतिक्रिया या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून उमटत असून, कर्जत कशेळे मुरबाड रस्त्यावरील खड्डे भरून वाहन चालकांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.
कर्जत मुरबाड रस्त्यावरील कशेळे सरकारी दवाखान्याच्या समोर, पेज नदिवरील खड्डा, वंजारवाडी पुलाचीवाडी येथील रस्त्याच्या मध्यमागी पडलेले खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल. तसेच खड्डे भरून मोठ्या अपघाताची घटना घडण्यापासूनचा अनर्थ टाळावा असे वाहनचालकांकडून तसेच नागरिकांकडून बोलले जात आहे.