अमुलकुमार जैन
अलिबाग : संपूर्ण रोह्याची अस्मिता असलेली करोडो रुपयांची सहकारी रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमिन बिल्डरांना अवघ्या एक कोटी दहा लाखात विकली गेली असल्याची बातमी पसरली आणि रोहासह सबंध तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र. त्यातून रोहेकर व ठेवीदार खडबडून जागे झाले. सदर व्यवहार हा रद्द करण्यात यावा अशी मागणी रोहेकर यांच्यावतीने शासकीय विश्रामगृहात समीर शेडगे, अमित घाग व नितीन परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांच्या आदेशाने सदर लिलाव रद्दबातल करण्यात आल्याने रोहेकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आचारसंहितेच्या काळात हा व्यवहार झाल्याचे फार उशिरा उघडकीस आले.
रोहा अष्टमी अर्बन बँकेत १२०१० शेअर होल्डर आहेत. राजकीय बड्या कर्जदारांमुळे या बँकेला २००७ साली घरघर लागली. बँक बंद पडल्याने अनेक गोरगरीब लोकांचे, रोहा नगरपालिका, ईतर छोट्या पतसंस्था यांचे साडेचार कोटी रुपये बँकेकडे थकले आहेत. या बँकेची मालमत्ता सर्वांना अंधारात ठेवून परस्पर विक्री झाल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे टेंडर घेणाऱ्या बिल्डरचे आईवडील व नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर आणि थकीत कर्जदार असताना नियमबाह्य पद्धतीने एक बिल्डरला ही मालमत्ता विकली असल्यामुळे रोहेकर चांगलेच संतापले होते. मालमत्ता विकताना बँकेचे निकष व नियम धाबयावर बसवून मालमत्ता विकली गेली. याबाबत रोहेकर नागरिक, ठेवीदारांनी संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात रोहेकरांच्यावतीने शासकीय विश्रामगृहात समीर शेडगे, अमित घाग व नितीन परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले होते.
हे वृत्त समजताच खा. सुनील तटकरे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना फोनवरुन रोहेकरांची संतप्त भावना लक्षात घेऊन निर्णय प्रक्रियेला स्थगिती मिळावी अशी विनंती केली होती. त्यानंतर महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सहकार मंत्र्यांशी रोहेकरांच्या वतीने स्थगितीसाठी अर्ज दिला होता. या अर्जाची दखल घेत सदर मालमत्तेची झालेली निविदा प्रक्रिया रद्द करुन फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांनी आपल्या स्तरावर करावी असे निर्देश महाराष्ट्र शासन अवर सचिव मंजुषा साळवी यांनी दिले आहेत. सदर रोहा अष्टमी बँक व्यवहार रद्द झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले असून समस्त रोहेकरांनी खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांचे आभार व्यक्त केले.