• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन माजी आमदार ठाकरेंची साथ सोडणार

ByEditor

Jan 31, 2025

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबरोबर लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी येत्या तीन तारखेलाच भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत .

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात लवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. शिवसेना पक्षाच्या फुटी नंतर शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. दापोली खेड पासून ते राजापूर तालुक्याच्या टोकापर्यंत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा धडाका लागलेला असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देण्यात येत आहेत. नुकतेच ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदार संघ सोडल्यास ठाकरे गटाचे बुरुज ढासळू लागले आहेत.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू केल्याचे जाहीर करून अनेक ठाकरे गटातील नेते व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचाच एक भाग म्हणून लांजा राजापूरचे माजी आमदार गणपत कदम तसेच संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने लवकरच शिंदे गटात सहभागी होणार आहेत. विद्यमान भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणेंबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र कालांतराने काँग्रेस मधून नारायण राणे यांची साथ सोडून माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला होता.

राणेंनी २००५ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी बने व कदम यांनी त्यांना साथ दिली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पण २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बनेंचा संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत विभागला गेला, तर कदम पराभूत झाले. त्यानंतर नाराज झालेले सुभाष बने आणि गणपत कदम यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्वगृही प्रवेश दिला होता. गेली काही वर्ष शिवसेनेत असलेले बने व कदम आता ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. याबरोबर लांजा राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी पोलिसांच्या कारवाईला कंटाळून आता भाजपवासी होणार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित येत्या ३ तारखेला होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण या तीनही माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाने ढवळून निघणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तिन्ही माजी आमदार पक्षाला सोडचिट्टी देणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाची मोठी हानी होणार आहे. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपात येण्याविषयी कोणतेच बोलणे झाले नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मात्र चव्हाण यांच्या या स्पष्टीकरणाने माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपातील पक्षप्रवेशाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!