रत्नागिरी : कोकणात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटात आणखी एका मोठ्या घटनेची भर पडली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक बसली.
या धडकेनंतर दोन्ही बार्ज पुलाजवळ अडकून पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्काळ बंद केली आहे.
या घटनेमुळे रत्नागिरी-रायगडमधील महत्त्वाचा संपर्क पूर्णपणे ठप्प झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आधीच कशेडी घाटातील दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असताना, आता म्हाप्रळ-आंबेत पूल बंद झाल्याने कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
सध्या प्रशासनाकडून बार्ज हटविण्याचे आणि पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील आदेश मिळेपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
