विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात?
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील चिंचवली तर्फे अतोणे ते कांदळे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असुन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गानी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अतिशय दुर्गम भागातील चिंचवली तर्फे अतोणे ते कांदळे बेलवाडी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असुन या मार्गाने विठ्ठलवाडी हायस्कूल येथे जाणारे कांदळे बेलवाडी येथील असंख्य विद्यार्थी तसेच कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक या मार्गाने प्रवास करीत आहेत. रस्त्याला असणारी वेडीवाकडी अवघड वळणे, रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झुडपे यामुळे येणारी जाणारी वाहने दिसत नाहीत. शिवाय अरुंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याच्या कामाची जाहिरात सप्टेंबर २०२२ रोजी देण्यात आली होती व या रस्त्याच्या कामाचा ठेका सिद्धिविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदाराने मिळवला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी देऊन दोन वर्षापेक्षा जास्त दिवस होऊन गेले तरी अद्यापही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम केले जाईल काय? असा संतप्त सवाल या मार्गानी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.