अनंत नारंगीकर
उरण : उरणमध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये शाळा, कॉलेजचे तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून ही एक गंभीर बाब समोर येत आहे. व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स वाटते, ताण-तणाव कमी होतो, असेही गैरसमज युवकांमध्ये आहेत. एकंदरीत शहरातील तरुणाई बरोबर ग्रामीण भागातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चालली असल्याचे भयानक चित्र सध्या उरणमधील शाळा, कॉलेजच्या अडगळीच्या जागेत पाहावयास मिळत आहे.
उरण पंचायत समितीच्या नुकताच पार पडलेल्या आमसभेत सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरण तालुक्यातील तरुणाई विशेष करून शाळा, कॉलेजचे विद्यार्थी हे अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. तसेच तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गृह तसेच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली. परंतु अशा गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्याकडे पोलीस यंत्रणेबरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज शनिवारी (दि. १) शाळा कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी हे आपआपल्या घराकडे, विद्यालयाकडे जात असताना त्यातील काही तरुण हे अडगळीच्या जागेत दम मारो दमच्या सुरात अंमली पदार्थ सेवन करतानाचे भयानक दृश्य समोर येत होते.
उरण पोलीस यंत्रणेने नुकताच पागोटे गावाजवळ गांजा पकडल्याचे पत्रकारांना सांगितले, मात्र पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना विशेष करून तरुणाईला सहज उपलब्ध होत आहेत. शहरात अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा, चरस व गर्द (मॅफेडोन, हेरॉईन किंवा ब्राऊन शूगर) विकले जात असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तरी पोलीस यंत्रणेने व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोपटा उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरणच्या आमसभेत उपस्थित केलेल्या अंमली पदार्थांच्या प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता न दाखविता उरणच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.