वार्ताहर
श्रीवर्धन : येथील एसटी आगारातून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागासाठी नियमित गाड्या मार्गस्थ होतात. हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने येथे पर्यटकांची व स्थानिक प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, आगारातील गाड्यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा गाड्या मार्गातच बंद पडतात, रेडीएटरमधून धूर येतो, दरवाजे दोरीने बांधलेले असतात, खिडक्यांना काचा नसतात, आसने मोडकळीला आलेली असतात, तर चाकांचे नटबोल्टही सैल झालेले आढळून येतात. इतकेच नव्हे तर प्रवासी थांब्यावर उभे असतानाही चालक गाडी न थांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
या वाढत्या समस्यांकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी आगारप्रमुखांना प्रतीकात्मक पान भेट देत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी गाड्यांची तातडीने देखभाल-दुरुस्ती करून योग्य अवस्थेत मार्गस्थ करण्याची मागणी केली.
स्थानिक प्रवासी व पर्यटकांसाठी एसटी ही प्रमुख वाहतूक व्यवस्था असल्याने सद्यस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
