• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवेआगर पर्यटन येतंय रुळावर!

ByEditor

Aug 13, 2023

दोन महिन्यानंतर हॉटेल, बीच सुरू; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाला उभारी

गणेश प्रभाळे
दिघी :
पावसाची विश्रांती आणि सलग सुट्टया घालवायला राज्यभरातील पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात वाट धरली आहे. यावेळी दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच पर्यटकांच्या गर्दीने दिवेआगर पर्यटन स्थळ फुलले आहे.

पावसाळी दिवस सुरू असल्याने येथील हॉटेल्स खुली असून सुद्धा पर्यटक फारसे येताना दिसत नव्हते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा थोडा अपेक्षाभंगच झालेला होता. जोपर्यंत पर्यटनाला सुरुवात होत नाही तोर्पयत हॉटेल्स खुली करून देखील फारसा अर्थ नसतो. त्यामुळे पावसाळी कोकणातल्या पर्यटन उद्योगासमोर अशी अनेक मोठी आव्हानेही उभी असतात. मात्र, यंदा जुलै महिन्याच्या दमदार पावसानंतर गेल्या आठवड्यापासून चांगलीच उघडीप झाल्याने येथील निसर्ग सौंदर्य अनुभवायला पर्यटकांची पावले वळली आहेत.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनारे व प्राचीन मंदिरांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते. या दिवसात अधून-मधून पावसाच्या सरी बरसत असून याचा आनंदही पर्यटक घेत आहेत. दोन महिन्यांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी संपल्याने पर्यटनाला जोडलेल्या व्यवसायाची देखील सुरुवात झाली आहे. दिवेआगर पर्यटन सुरू होत असून या चार-पाच दिवसात हळूहळू गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!