नागोठणे बसस्थानक नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत
किरण लाड
नागोठणे : सरकार आले किती, गेले किती पण नागोठणे बसस्थानकाची दयनीय अवस्था जैसे थे. दगड धोंडे निघालेत, अंबा नदीच्या पूराचे पाणी सतत बस स्थानकांमध्ये घुसुन इमारतची अवस्था दयनीय झाली आहे. बस स्थानकामध्ये आल्यानंतर जमिनीतून बाहेर निघालेले दगड धोंडे बसच्या टायरखाली येऊन प्रवासी जायबंदी होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रवाशांना पिण्याच्या पाणीची सोय नाही, भुक लागली तर कॅन्टीनची सोय नाही. शौचालयाची दुरावस्था, बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी पंखे आहेत मात्र काही पंखे नादुरुस्त आहेत. एकंदरीत अशा विविध समस्यांनी ग्रासलेले नागोठणे बसस्थानक नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.

नागोठणे हे मध्यवर्ती तसेच औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. रिलायन्स कंपनी, सुप्रिम कंपनी, जिंदल कंपनी यांसारखे मोठे कारखाने नागोठणे विभागात आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्ग अशा वाहतुकीचे जाळे असल्यामुळे नागोठणे शहराला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. यामुळे नागोठण्यातील बसस्थानकही अद्ययावत असावे असे येथील नागरिकांना तसेच एसटीने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना वाटत आहे. पुर्वी या बसस्थानकातुन राज्यातील विविध ठिकाणी जाण्या-येण्यासाठी बसच्या 200 फेऱ्या ये-जा करीत असत. परंतु हाच आकडा आता 177 ते 180 पर्यंत आलेला आहे. फक्त रोहा, पेण, अलिबाग, माणगांव, महाड, श्रीवर्धन, मुरुड या आगाराच्या बस नागोठणे स्थानकात ये-जा करीत असतात. बस स्थानकाच्या आवारात मोठ मोठे खड्डे पडुन दगड बाहेर आले आहेत. एखादा दगड टायरखाली येऊन प्रवाशी जखमी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत.







पूर्वी कोकण, मुंबईत जाणाऱ्या बस क्षणभर विश्रांतीसाठी नागोठणे स्थानकात थांबत असत. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची कॅन्टीनची सुविधा होती. मात्र एसटी कॅन्टीन करोना काळापासून बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पुरुषांची शौचालयाची इमारत जुनी असल्याने मोडकळीस आली आहे. सीएसआर फंडातुन महिलांचे शौचालय नवीन बांधले आहे पण ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. प्रवाशांना स्वच्छतेसाठी असणारी नळ व्यवस्था बंद स्थितीत आहे. बसस्थानकाची इमारत धोकादायक बनली आहे. पावसापासून संरक्षणासाठी इमारतीवर प्लॅस्टिक टाकलेले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी पंखे आहेत पण काही पंखे दूरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा अनेक कारणांमुळे नागोठणे बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. या असुविधेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी नागोठणे बसस्थानकाकडे पाठ फिरवली असून स्थानकात शुकशुकाट असल्याचे चित्र नेहमीच दिसत आहे. बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची लालपरी नागोठणे बसस्थानक नुतनीकरणा बरोबर सर्व सुविधाने अद्ययावत करावे अशी मागणी नागरिक तसेच प्रवाशांनी शासनाकडे केली आहे.

माझी परवाच जिल्हाधिकारी रायगड यांच्यासोबत वरील विषयासंदर्भात मिटिंग झाली आहे. आघाडी सरकारच्या काळात नागोठणे बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटीचा निधी मंजूर करुन घेतला होता. परंतु सरकार बदलल्यामुळे बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम थांबले आहे. आता परत बसस्थानक नुतनीकरणाचा नवीन आराखडा तयार करुन मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. लोकप्रतिनधी म्हणुन जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहे. प्रवाशांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसातच करण्यात येईल.
–अनिकेत तटकरे,
आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य.
एसटी कॅन्टीन चालू असतांना स्थानकामध्ये बऱ्याचशा बस ये-जा करीत होत्या. परंतु आता येथील स्थानकातील कॅन्टीन बंद असल्याने गाड्या बाहेरूनच महामार्गावरून जातात. तसेच पावसाळ्यात 3 ते 4 वेळा पुराचे पाणी बसस्थानकात घुसते. त्यावेळी प्रवाशांना पर्यायी व्यवस्था हायवेवरुन केली जाते. अशावेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकाची जुनी इमारत, शौचालयाची दुरवस्था, विविध सुविधेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांनी, बसेसनी नागोठणे बसस्थानकाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या रोडवलेली आहे. त्याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर बसत आहे. दोन वर्षापूर्वी बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी काही कोटीचा निधी मंजूर झाला होता. तसा कार्यक्रमही बसस्थानकाच्या आवारात झाला होता. त्याचे पुढे काय झाले माहित नाही. सर्वांच्या दृष्टीने नागोठणे बसस्थानकाचे नुतनीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
–प्रसाद पाटील
वाहतूक नियत्रंक, नागोठणे बस स्थानक