किरण लाड
रायगड : बोल बजरंग बली की जय, गोविंदा रे गोपाळा हे शब्द नुसते जरी कानावर पडले तरी थरातील गोविंदाच्या अंगात एक स्फुर्तिचा, ताकदीचा वारा शिरतो. श्रावण महिन्यातील हिंदुचा पवित्र तसेच आवडता सण, साहसी मैदानी खेळ म्हणजे ‘गोविंदा’ या खेळातील गोविंदा पथकांना आता शासनाकडुन विमासंरक्षण मिळणार आहे .तसा शासन निर्णय झाला आहे.
दही हंडी उत्सव तसेच प्रो गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदाना मानवी मनोरे रचता वेळी अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. काहीवेळा पथकातील गोविंदाचा मृत्यू देखील ओढवु शकतो किंवा अशावेळी अंशतः किंवा पूर्णतः जायबंदी होऊ शकतो. अशी घटना घडल्यानंतर अपघातग्रस्त गोविंदाना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. या अनुषंगाने गोविंदाना विमासंरक्षण देण्यासाठी 50,000 गोविंदाना प्रति गोविंदा रु. 75 याप्रमाणे रुपये 37,50,000 इतका निधी शासनाने मंजूर करुन तो विमा कंपनीस देण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सोपविला आहे.
दहीहंडी उत्सवातील गोविंदाच्या सुरक्षेबाबत मा. न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश व त्या अनुषंगाने शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाने निर्गमित केलेले आदेश विचारात घेऊन सन 2023 च्या दहीहंडी उत्सवातील सहभागी होणाऱ्या गोविंदाना विमासंरक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जर गोविंदा पथकातील एखाद्या गोविंदाचा अपघाती मृत्यु झाला तर, त्याच्या वारसाला विमासरक्षंण अंतर्गत रुपये 10 लाख मिळतील. दोन अवयव, किंवा दोन डोळे गमवल्यास रुपये 10 लाख, एक हात, एक पाय व एक डोळा गमवल्यास रुपये 5 लाख, कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व आल्यास रुपये 10 लाख, अंशतः अपंगत्व आल्यास विमा कंपनीच्या विमा पाॅलिसीमध्ये नमुद केलेल्या टक्केवारी नुसार रक्कम मिळेल. तसेच अपघातग्रस्त गोविंदाना रुग्णालयात असेपर्यंत खर्च मिळणार आहे. सदर विमासरक्षंणाच्या अटी व नियम शासनाच्या तसेच विमा कंपनीने लागू केलेल्या नियमानुसार राहणार आहेत. सदर विमासंरक्षणाचा कालावधी दि. 8 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील. यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसेच मंत्रीमंडळाने घेतलेल्या वरील चांगल्या निर्णायाचे सर्व गोविंदा पथकांनी स्वागत केले आहे.