पिरवाडी किनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारे बचावकार्य; जीवाची बाजी लावत दोघांना जीवदान
उरण | घनश्याम कडू
उरणमधील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका जोडप्याला वाढत्या भरतीच्या लाटांनी वेढल्याची थरारक घटना समोर आली आहे. मृत्यू समोर दिसत असतानाच, नागाव सागर रक्षक दलाच्या जवानांनी देवदूतासारखी धाव घेत या जोडप्याचे प्राण वाचवले. या साहसी बचावकार्यामुळे परिसरात रक्षक दलाचे मोठे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर हे जोडपे फिरण्यासाठी आले होते. समुद्राची ओहोटी असल्याने ते किनाऱ्यापासून बरेच आत गेले होते. मात्र, अचानक भरती सुरू झाली आणि पाहता पाहता समुद्राचे पाणी वेगाने वाढले. लाटांचा जोर इतका प्रचंड होता की, या जोडप्याला किनाऱ्याकडे परतणे अशक्य झाले. काही क्षणांतच ते पाण्याने वेढले गेले आणि त्यांचा जीव धोक्यात आला.
जीवाची बाजी लावून बचावकार्य
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने नागाव सागर रक्षक दलाला पाचारण केले. दलाचे प्रतिनिधी आशिष काठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही वेळ न घालवता समुद्रात झेप घेतली. एकीकडे समुद्राच्या उसळणाऱ्या धोकादायक लाटा आणि दुसरीकडे वेगाने वाढणारी पाण्याची पातळी, अशा आव्हानात्मक परिस्थितीत रक्षक दलाने कौशल्याने त्या जोडप्यापर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
“भरतीचा वेग पाहून आम्ही क्षणभर हादरलो होतो, पण पर्यटकांचे प्राण वाचवणे हे आमचे पहिले कर्तव्य होते. योग्य वेळी मदत पोहोचल्याने अनर्थ टळला.”
— आशिष काठे, नागाव सागर रक्षक दल.
पर्यटकांना खबरदारीचे आवाहन
उरणमधील पिरवाडी आणि आजूबाजूचे किनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरत असले तरी, भरती-ओहोटीच्या वेळा न पाळणे जीवावर बेतू शकते. विशेषतः भरतीच्या वेळी समुद्रात जाणे अत्यंत धोकादायक असते. पर्यटकांनी उत्साहाच्या भरात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आणि स्थानिक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
