आरोग्य विभागामार्फत काळजी घेण्याचे आवाहन
वैभव कळस
म्हसळा : मुंबई पाठोपाठ आता सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. म्हसळा तालुक्यातही या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळूहळू डोळ्यांची साथ म्हसळा शहरासह ग्रामीण भागात पसरु लागली असून रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. लहान मुलांपासून वयोवृध्द व्यक्तींचे डोळे येण्याचा आजार बळावला आहे. शाळकरी मुलांनाचे डोळे येत असल्याने शाळा प्रशासनासमोर चिंतेचा विषय बनला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार म्हसळा तालुक्यात 169 जणांना लागण झाली आहे. डोळे येणे हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा समजला जात नाही पण तो संसर्गजन्य असल्याने डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांवर परिणाम होत आहे. डोळे बरे व्हायला बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणे योग्य आहे. डोळे आल्याने डोळ्यांचा रंग लाल गुलाबी होतो. डोळ्यांची जळजळ होते, खाज सुटते, सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी वाहणे, सुज येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. डोळ्यांच्या साथीबरोबरच सर्दी, ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.
डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवावेत. डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे. कुटुंबीयांपासून दूर राहावे, तेलकट खाणे टाळावे, डोळ्याची जळजळ व त्रास काही ठराविक दिवसानंतर कमी होत नसल्यास डॅाक्टरी सल्ला घ्यावा. डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवून घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे डोेळ्यात टाकावे.
– डॉ. वंदन पाटील
तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा