अनंत नारंगीकर
उरण : महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर गुरुवारी (दि. ७) पहाटेपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसा अभावी कोमेजून, करपून जाणाऱ्या भात पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या पावसाने उरण तालुक्यातील काही अंशी भात शेतीला नवसंजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
उरण तालुका हा डोंगर कुशीत, खाडीकिनारी वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे आपल्या शेतजमीनीत पावसाळ्यात भाताचे पीक घेत आहेत. मात्र जुलै महिन्यात भात रोपांची लागवड झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने लागवडी खाली आलेली भाताची रोपे ही पावसा अभावी कोमेजून करपून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. मात्र, दहीहंडी उत्सवातच गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात शेतीला दिलासा मिळाला आहे. एकंदरीत कोमेजून, करपून चाललेल्या भात पिकांना नवसंजीवनी ठरणारा पाऊस झाला असल्याची चर्चा सध्या गावागावातील चावडीवर बसून शेतकऱ्यांमध्ये केली जात आहे.
