अनंत नारंगीकर
उरण : तालुक्याच्या पूर्व भागात चिरनेर, कळंबुसरे सह अनेक गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आयडीया, एअरटेल, जिओ कार्डचे अनेक ग्राहक आहेत. मात्र, या ग्राहकांना मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक हैराण झाले आहेत.
उरण पूर्व भाग हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, याच ग्रामीण भागात अनेक उच्चशिक्षित नागरिक, विद्यार्थी वास्तव्य करीत आहेत. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे निर्माण होत असल्याने कामगार वर्गाची वस्ती वाढत आहे. यामधिल अनेक नागरीक, कामगारांकडे आयडीया, जिओ, एयरटेल कंपन्यांचे मोबाईल कार्ड आहेत. तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकही या फोन कार्डचा वापर करीत आहेत. मात्र, अनेक वेळा इमर्जन्सी असतानाही फोन लागत नाही. तसेच आयडीया, एअरटेल, जिओ मोबाईल फोनला नेटवर्क कमी प्रमाणात मिळत आहे. या कंपन्याचे टॉवर नादुरुस्त आहेत कि काय? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. लाईट गेल्यानंतर तर संपूर्ण नेटवर्क गायबच असतो. यामुळे सदर मोबाईलधारक ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी सदर मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी ग्राहकांच्या समस्या संदर्भात लक्ष देऊन ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मोबाईलधारक करीत आहेत.