• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कळंबूसरे बायपास रस्त्याचा तिढा सुटत नसल्याने प्रवाशांमध्ये नैराश्याची भावना

ByEditor

May 23, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
कळंबूसरे आणि मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतून कोप्रोली-चिरनेरकडे जाणाऱ्या कळंबूसरे बायपास रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामूळे या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी सदर एक कि.मी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशी, वाहनचालक करत आहेत. मात्र, कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांनी बायपास रस्त्याच्या कामाला कडाडून विरोध दर्शविला असल्याने कळंबुसरे बायपास रस्त्याचा तिढा सुटता सुटत नसल्याने प्रवाशांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.

जेएनपीए बंदराच्या माध्यमातून उरण पुर्व विभागात ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाचा तसेच वाहन चालकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कार्यालयातील अधिकारी वर्गानी कळंबूसरे आणि मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतून पर्यायी रस्ता म्हणून १ किमीच्या बायपास रस्त्याची निर्मिती ही २००७ या वर्षांत केली. परंतू, रस्त्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला आजतागायत कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांना न मिळाल्याने सदर शेतकऱ्यांनी रस्त्याच्या नव्याने होत असलेल्या डांबरीकरणाच्या कामाला प्रखर विरोध दर्शविला असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कार्यालयातील अधिकारी वर्गाने सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशी, वाहनचालक करत आहेत.

या मागणीची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणने घेऊन बायपास रस्त्याचा तिढा कायमस्वरुपी सोडविण्यासाठी बुधवारी (दि. २२) सदर संपादित जागेचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न पोलीस फौजफाट्यासह केला होता. मात्र, शासनाच्या या प्रक्रियेला कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यामुळे कळंबुसरे बायपास रस्त्याचा तिढा आजही कायम आहे.

बायपास रस्त्याच्या जमिनीचा मोबदला आजतागायत शेतकऱ्यांना मिळाला नाही. असे असताना आम्हा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग उरण चुकीच्या मार्गाचा अवलंब करून शेतकऱ्यांची जमीन मोजणीचा घाट घालत असतील तर त्याला शेतकऱ्यांचा विरोध राहणार आहे.

-गजानन गायकवाड,
शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य

शेतकऱ्यांना नोटीस मिळाली नसेल तर हे चुकीचे आहे. आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याने मोजणीसाठी बोलावले होते. आमचा त्यामध्ये कोणताही उद्देश नाही. जर सर्व शेतकऱ्यांना नोटीस न देता प्रकिया राबविली असेल तर सा. बां. ने सांगितले तर आम्ही नोटीस देऊन पुन्हा प्रकिया राबवू शकतो.

-एम. आर. अत्तर,
उपअभियंता, भूमी अभिलेख

कळंबुसरे बायपास रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रेंगाळत पडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी सदर रस्त्याच्या जमिनीचा सर्व्हे होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शासनस्तरावरुन जागेचा सर्व्हे बुधवारी (दि. २२) करण्यात येणार होता.

-नरेश पवार,
उपअभियंता, सा. बां. विभाग उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!