ढिसाळ नियोजन व इच्छाशक्तिचा अभाव
विठ्ठल ममताबादे
उरण : देशात स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सर्वत्र आहे मात्र, उरणच्या ग्रामपंचायतींच्या ढिसाळ नियोजनापोटी कचरा प्रश्नाचे तीनतेरा वाजले आहेत. उरण तालुक्यातील ढिसाळ नियोजनापोटी गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे.
मुंबईपासून उरण तालुका हाकेच्या अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठं महानगर असणाऱ्या मुंबई शहराजवळील उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला जात आहे. प्रवाशांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या उरण तालुक्यातील चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड, सारडे, पिरकोन वशेणी, पुनाडे, पानदिवे, खोपटा तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमधील नागरिक ओल्या, सुक्या कचऱ्याचे नियोजन न करता हा कचरा रस्त्यावर टाकत आहेत. ओला कचरा मोठ्या प्रमाणात कुजत असून, या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीने व त्यामुळे निर्माण होणाऱ्या डासांमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सरकार स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करत स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. तर या स्वच्छता अभियानाचे उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील नागरिक स्वच्छतेचे तीनतेरा वाजवीत आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्वच्छतेसाठी उरण तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासन सुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे उरण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओला कचरा सुका कचरा वेगळा करावा, शिवाय असलेल्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करावे, अशी जनजागृती करण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना हक्काचे डम्पिंग ग्राउंड नाही. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात कचऱ्याचे विघटन करता येईल अशी सेवा देखील नाही. परिणामी ग्रामीण भागातील नागरिक गावातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. त्यामुळे प्रचंड अशी दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. कारण रस्त्याच्या बाजूला टाकलेला कचरा हा मोकाट जनावरे खात असून जनावरांच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक देखील जात आहे. येत्या काळात पावसाळा सुरू होणार असून या कचऱ्याची समस्या पावसाळ्यात अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी उरण तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
उरण तालुक्यात डम्पिंग ग्राउंड विरहित कचरा व्यवस्थापनाकडे ग्रामपंचायतींची वाटचाल सुरू आहे. भविष्यातही येथे ग्रामपंचायतीत तरी डम्पिंग ग्राउंड होणार नाही. त्यामुळे कचऱ्याचे विघटन कसे करावे, ओला कचरा सुका कचरा वेगळा करावा, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करावे व सुक्या कचऱ्याचे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असे प्रयोग करून उरण तालुक्यातील कचऱ्याचे विघटन करावे अशा सूचना ग्रामपंचायतीना देण्यात येत आहेत.
-एस. पी. वाठारकर
गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती