घन:श्याम कडू
उरण : चाणजे ग्रामपंचायतने काही महिन्यांपूर्वी लाखों रुपये खर्च करून अनेक ठिकठिकाणी कचरा कुंड्या उभारल्या होत्या. त्यातील काही कचराकुंड्या गायब होऊन त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावरून ग्रामपंचायतचे लाखों रुपये पाण्यात गेले त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर ग्रामसेवक यांनी जनतेला द्यावे अशी मागणी चाणजे ग्रामस्थांकडून केली जात आहे.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याबद्दल अनेक तक्रारी अर्ज दाखल होऊनही आजतागायत कोणतीच कारवाई अथवा चौकशी करण्याऐवजी तक्रारी अर्ज निकाली काढण्याचे प्रताप अधिकारी वर्गानी केले आहेत. यामुळे एका ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावरून शेतच कुंपणच खात असेल तर दाद कुणाकडे मागायचे असा सवाल उपस्थित होते.

करंजा ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाखों रुपये खर्च करून अनेक ठिकाणी विकासकामे केल्याचा डांगोरा पिटला जातो. परंतु माहितीच्या अधिकारात त्याची माहिती मागितली असता माहिती दिली जात नसल्याचे तक्रारदार सांगतात. काही महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी लाखों रुपये खर्च करून कचऱ्याकुंड्यां बांधण्यात आल्या होत्या. त्यातील काही कचराकुंड्या गायब झाल्या आहेत.
कचराकुंड्या उभारताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शासकीय जागेवर कचराकुंड्या उभारल्याचे बोलले जाते. जर अशा प्रकारे लाखों रुपये खर्च करून उभारलेल्या कचराकुंड्या गायब होऊन हा पैसा वाया गेला याला जबाबदार कोण, याबाबत विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी अथवा इतर वरिष्ठ अधिकारी माहिती देण्याऐवजी चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेतात. तरी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतील असा सवाल करंजा ग्रामस्थांकडून केला जात आहे.