मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलावरील पाणी थेट महामार्गावरील सर्विस रोडवर कोसळत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे योग्य नियोजना अभावी अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर पाहण्यास मिळत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 नूतनीकरणाच्या कामात अनेक उड्डाणपूलांवर साठणारे पाणी पाईपद्वारे पुलाच्या खाली असणाऱ्या गटारामध्ये सोडण्याचे नियोजन असताना हे नियोजन पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे वाया गेले आहे. पुलावरील पाणी थेट सर्विस रोडवरील रस्त्यावर येऊन पाण्याचा प्रवाह तयार होत आहे. पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी योग्य नियोजन केले नसल्याने हि स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ठेकेदार कंपनी आणि स्थानिक महामार्ग विभागाच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर मागील सतरा वर्षात कायम प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रस्ता समतोल पातळीत नसल्याने होणाऱ्या ‘जम्पिंग जपाक’मुळे वाहनांचे नुकसान होत आहे. मात्र, त्याचा त्रास वाहनातून प्रवास करणाऱ्या वृद्ध व अपंग व्यक्तींसहित गर्भवती महिलांना देखील होत आहे. आजही अपूर्ण असलेल्या या मुंबई गोवा महामार्गाच्या संपूर्ण कामाबाबत कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. या धुवाधार पावसामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज होती. मात्र, मुंबई गोवा महामार्गावर आजही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत आहे. महाड शहरानजीक नातेखिंड येथून थेट चांभार खिंड ते नडगावपर्यंत ठीकठिकाणी उड्डाणपूलांची निर्मिती केली आहे. या उड्डाणपुलावर पाणी साचून राहू नये म्हणून उड्डाणपुलावरून पाईप टाकण्यात आले आहेत. हे पाईप खाली असलेल्या रस्त्यालगत गटारामध्ये सोडणे अपेक्षित होते. मात्र, पैसा वाचवण्याचे हेतूने संबंधित ठेकेदाराने हे पाईप गटारापासून काही अंतरावर तसेच सोडून दिले आहेत. यामुळे उड्डाण पुलावरील पाणी खाली असलेल्या गटारावरील स्लॅबवर कोसळत आहे आणि थेट रस्त्यांवर वाहत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर नाते खिंड येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असताना दिसून येत आहे. यामुळे रस्त्यावर पाण्याचा नाला वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाण्याबरोबर येणाऱ्या दगडी, कचरा हा रस्त्यावर साचून राहत असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर गेली अनेक वर्ष रस्ता पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. कोकणात जाणाऱ्या या महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूलांची निर्मिती केली आहे. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात इंदापूर ते कशेडी दरम्यान असणाऱ्या लोणेरे, टेमपाले, वीर, दासगाव, वहूर, गांधारपाले, नातेखिंड, चांभार खिंड, नडगाव, चांढवे, पार्ले, पोलादपूर या गावांजवळ उड्डाणपूल बांधले आहेत. या उड्डाणपणामुळे आधीच गावांचे मोठे नुकसान झाले आहे. गावांची ओळख पुसली गेली असून स्थानिक नागरिकांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यातच महामार्गाच्या कामामध्ये काडीची गुणवत्ता नसल्याने महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. नियमानुसार उड्डाण पुलावरील पाणी खालून जाणाऱ्या रस्त्याकडेला असलेल्या गटारात सोडणे आवश्यक होते मात्र, सदर पाईप गटारामध्ये न सोडता अधांतरी सोडून दिले आहेत. अनेक काही ठिकाणी हे पाईप देखील तुटून खाली पडले आहेत. उड्डाणपुलावर साचलेला कचरा या पाईपमधून अडकल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे देखील दिसून येत आहे. तसेच महामार्गाच्या दुभाजकामध्ये देखील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था न केल्याने महामार्गाच्या एका बाजूकडील पाणी दुसऱ्या बाजूकडे रस्त्यावर येऊन वाहू लागले आहे. पावसाळी पाणी रस्त्यावर साचल्याने अपघाताची देखील शक्यता निर्माण होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. एकंदरीत ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कारभाराची मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.