अनंत नारंगीकर
उरण : १ जूनपासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असतानाही करंजा येथील अनेक मासेमारी बोटी बंदी झुगारून खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. अशाच एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेला आवरे गावातील अक्षय म्हात्रे हा युवक बेपत्ता असून तो मासेमारी करताना समुद्रात बुडाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, पैशाच्या हव्यासापोटी मत्स्य विभाग परवाना अधिकारी व पोलीस यंत्रणा अशा प्रकारची घटना घडत नसल्याचा दावा करत असेल तर उरणच्या मच्छी मार्केटमध्ये समुद्रातील मासळी येथे कुठून असा प्रश्न समोर येत आहे. तरी याबाबत सखोल चौकशी करून या तरुणाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
जून, जुलै या महिन्यात मत्स्यबिजांची पैदास होत असल्याने शासनाने या दोन महिन्यात समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. मात्र, या काळात मासेमारी करून लाखोंचा फायदा होत असल्याने करंजा, मोरा, दिघोडे, केळवणे, कोप्रोली गावातील मासेमारी बोटी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत बंदी झुगारून खोल समुद्रात मासेमारी करण्यास जातात. पर्सनेट पद्धतीने मासेमारी करून ती चोरट्या पद्धतीने विकली जाते. यासाठी मत्स्य विभाग व पोलीस अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून ही मासेमारी अजूनही बिनधास्त सुरू आहे.
या काळात मासेमारी बोटींवर जाणाऱ्या खलाश्यांना जास्त पैशांचे आमिष देवून त्यांना खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी नेले जाते. असाच एक आवरे गावातील अक्षय म्हात्रे हा युवक करंजा येथील एका बोटीवर पंधरा दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेला होता. मात्र, मासेमारी करताना तो खोल समुद्रात पडून बेपत्ता झाला. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, याची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून करंजा येथील बोटीच्या मालकाने त्याच्या कुटुंबीयांना काही लाखांची आर्थिक मदत करून त्यांची तोंडे बंद केल्याची चर्चा आहे. मागील वर्षी देखील पावसाळ्यात तीन खलाशी बेपत्ता झाले होते. मात्र जास्त पैशांच्या हव्यासापोटी मासेमारी बोटीचे मालक सामान्य खालाश्यांच्या जीवाशी खेळत असून अक्षय म्हात्रे सारख्या तरुणांचे जीव जात असल्याने नवीमुंबई पोलीस यंत्रणेने अक्षयच्या बेपत्ता प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि करंजा, खोपटा, दिघोडे, केळवणे, कडाप्पे, गोठणे या खाडीकिनारी आपली गस्त वाढवावी जेणेकरून अक्षय म्हात्रे या तरुण खलाश्याप्रमाणे इतर गरीब खलाश्यांचे यापुढे प्राण वाचतील अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.