मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची लगबग दरवर्षी असते. या निमित्त दरवर्षी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे देखील नियोजन केले जात असते. यावर्षी देखील गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांचे आरक्षण उद्या २८ जुलै पासून सुरू होत आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन आरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी प्रामुख्याने दोन दिवसांआधी कोकणवासीय नागरिक आपल्या घरी जात असतात. कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईत रहिवाशी आहे. हे सर्व गणेशोत्सव काळात गावी जात असतात. गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या वर्षी पश्चिम आणि कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य आणि कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली असून या गाड्यांचे तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत प्रतीक्षा यादीची क्षमता पूर्ण झाली. त्यामुळे आता पश्चिम आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या २८ जुलै रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या गाड्यांचे आरक्षण थेट तिकीट केंद्रात किंवा ऑनलाइन पद्धतीने करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणी माणूस मुंबईत असो किंवा अन्य कुठेही कामाला असला, तरी प्रत्येक कोकणवासी नागरिकाचे गणेशोत्सवाला गावी जाण्याचे नियोजन हे वर्षभरापूर्वीच ठरले असते. यावर्षी देखील गणेशोत्सव हा ७ सप्टेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे चाकरमानी हे दोन दिवस आधीच कोकणात जाण्याच्या लगबगीत असतात. याच पार्श्वभूमीवर कोकणातील गणेश भक्तांसाठी पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या रेल्वे सोडणार आहे. उन्हाळी व पावसाळ्यातील विशेष गाड्यांनंतर आता पश्चिम रेल्वेने गणपती उत्सवासाठी देखील विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली असल्याने या मुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवानिमित होणारी गर्दी कमी करण्यासाठी व नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे – मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, विश्वामित्री-कुडाळ आणि अहमदाबाद-मंगळुरु
काय आहे वेळापत्रक ?
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड
ट्रेन क्रमांक 09009 मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल या गाडीच्या २६ फेऱ्या होणार असून ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, या ठिकाणी दोन्ही दिशेने थांबेल. कनकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.
ही गाडी मुंबई सेंट्रल येथून दररोज (मंगळवार वगळता) 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन 2 ते 16 सप्टेंबर 2024 दरम्यान धावणार. ट्रेन क्रमांक 09010 सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल सावंतवाडी रोडवरून दररोज (बुधवार वगळता) 04.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन 3 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान धावणार आहे.
मुंबई सेंट्रल – ठोकूर साप्ताहिक
मुंबई सेंट्रल – ठोकूर साप्ताहिक स्पेशल ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी येथे दोन्ही दिशेने धावेल. , मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, मुकांबी रोड बयंदूर, कुंधापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशनवर थांबेल.
ही गाडी दर मंगळवारी मुंबई सेंट्रलवरून 12.00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 08.50 वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन 03 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९००२ ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल ही ठोकूर येथून दर बुधवारी रात्री ११.०० वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी ०७.०५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन 04 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत धावणार आहे.