मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयाला अमोल किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली. रवींद्र वायकर यांना उच्च न्यायालयाने समन्स बजावले असून, 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांच्यात मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आमने-सामने लढत झाली. या लढतीत रवींद्र वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला. अमोल किर्तीकर पुढे असताना फेरमतमोजणीत त्यांचा पराभव झाला. यात तांत्रिक विजय असल्याचा दावा, करत अमोल किर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने दाखल करून घेत रवींद्र वायकर यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
रवींद्र वायक यांना शपथविधीपासून रोखण्यासाठी प्रतिबंध करावा, यासाठी अमोल किर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची योग्य वेळेत सुनावणी होऊ शकली नाही. परंतु अमोल किर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. यावर उच्च न्यायालयाने रवींद्र वायकर यांना समन्स बजावले आहे. रवींद्र वायकर स्वतः न्यायालयात हजर राहतात की, त्यांच्यावतीने त्यांचे वकील न्यायालयासमोर हजर राहतात, याकडे लक्ष लागले आहे. ही याचिका दाखल झाल्याने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागतो? निकाल जैसे-थे राहतो की, फिरतो, याकडे आता लक्ष लागले आहे. त्यामुळे या याचिकेला महत्त्व आले आहे. अमोल किर्तीकर यांच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्याचे दिसते. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे. पुढची सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे.
धक्कादायक निकाल
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेचा धक्कादायक निकाल लागला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी जाहीर केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या. टपाल मतांची मोजणीनंतर अमोल किर्तीकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, त्यात अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करण्यात आला.