• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सर्व्हर डाऊनमुळे आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन

ByEditor

Jul 30, 2024

गरीब आणि सामान्य कुटुंबांचे हाल

मुंबई : महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना चार दिवसांपासून रेशन मिळणे बंद झाले आहे. कारण चार रेशनिंग प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाला आहे. तर 8 जुलैपासून सर्व्हरचा लपंडाव सुरू असल्याने रास्त धान्य दुकानातून रेशन देणे जवळपास ठप्प झाले आहे. याची झळ कोट्यवधी गरीब कुटुंबाना बसत आहे. तांत्रिक अडचणीमुळे रेशन दुकानांतून मोफत धान्य आणि स्वस्त धान्यविक्री बंद झाल्यामुळे गरीब आणि सामान्य कुटुंबांचे हाल होऊन त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक शिधावाटप दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

रास्त धान्य दुकाने ऑनलाईन झाली आहेत आणि पॉस मशिनवर धान्याची विक्री केली जाते. त्यामुळे सर्व्हर डाऊन झाला की धान्य देता येत नाही. 8 जुलैपासून रेशन संदर्भातील सर्व्हर लपंडाव करत आहे. दिवसातून अनेकवेळा सर्व्हर डाऊन होत असल्याने शिधावाटपाचे काम खोळंबले आहे. त्यामुळे ग्राहकाला दुकानात थांबूनही रेशन मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे 8 जुलैपासून शिधावाटपाचे काम खोळंबले आहे आणि शिधापत्रिकाधारकांचीही प्रचंड गैरसोय होत आहे, असे रेशन दुकानदारांनी सांगितले.

अशातच आठ दिवसांपूर्वी डाऊन झालेला सर्व्हर अजून अप न झाल्यामुळे आता ग्राहकांना शिधावाटप करण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. राज्यातील कोट्यवधी गरीब कुटुंबाना मोफत धान्य मिळत नसल्याने त्यांना बाहेरून जास्त पैसे मोजून धान्य घ्यावे लागत आहे. याबाबत रेशन दुकानदारांच्या संघटनेने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात तक्रार केली होती. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे या महिन्याचे धान्य कॅरी फॉरवर्ड करण्याची मागणी रेशन दुकानदार करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!