माजी सभापती विश्वास म्हात्रे यांचा अधिकारी वर्गाला सवाल
घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील खोपटे परिसरात शासकीय जागेवर गेली अनेक वर्षांपासून अनधिकृत कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. त्यावर अनेकवेळा तक्रारी करूनही शासकीय अधिकारी वर्ग आर्थिक साटेलोट्यामुळे कोणतीच कारवाई करीत नाहीत. तरी अधिकारी वर्ग कारवाई करण्याची हिंमत कधी दाखविणार? असा संतप्त सवाल माजी सभापती विश्वास म्हात्रे यांनी काल शिवसेना (उबाठा) पक्षाने आयोजित केलेल्या मोर्चात केला.
शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे उरणकरांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत प्रशासन लक्ष देत नसल्याने उरण तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक समस्यांचा भडिमार नेतेमंडळीकडून करण्यात आला. अधिकारी वर्गानी नेहमीच्या स्टाईलने लवकरच कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे.
यावेळी माजी सभापती यांनी खोपटे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाच्या जागेवर अनधिकृत कंटेनर यार्ड व एमटी कंटेनर यार्ड गेली अनेक वर्षांपासून सुरू आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नरेश पवार यांनी थातुरमातुर कारण सांगून आजच्या बैठकीकडे पाठ फिरवली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी आमची शासकीय जागा असल्याचे माहिती नसून पाहून कारवाई करतो असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत साम्राज्य उभे राहिले आहे. यावर अनेकवेळा लेखी पत्रव्यवहार व माहितीच्या अधिकारात माहिती मागूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. याचा अर्थ अधिकारी वर्गाचे आर्थिक साटेलोट्यामुळे कारवाई होत नसावी. जर तसे नसेल तर सबंधित अधिकारी वर्ग शासकीय जागेवरील अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करण्याची हिंमत कधी दाखवतील? असा सवाल यावेळी माजी सभापती विश्वास म्हात्रे यांनी अधिकारी वर्गाला केला आहे.