घन:श्याम कडू
उरण : प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरीता दि. ६ ऑगस्ट २०२४ ते दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सूरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यातील नगरपरिषदआणि नगरपंचायतीमधील कामगार, कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत प्रधान सचिव नगर विकास विभाग के. एच. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली उप सचिव अनिरूद्ध जेवळीकर, अवर सचिव अशोक लक्कस, आणि उप संचालक समिर उन्हाळे यांच्या समवेत संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये संघर्ष समितीच्यावतीने वेळोवेळी सादर केलेल्या १८ मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निश्चित कालावधीमध्ये ह्या मागण्यांबाबत कारवाई करण्याचे निश्चित झाल्यामुळे कामबंद आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आला आहे.
मागण्यांमध्ये प्रामुख्याने ग्रा. प. मधून नगरपंचायतमध्ये पात्र व अपात्र कर्मचारी यांचे समावेशन ३१ ऑगस्टपर्यंत करण्याचे कर्मचाऱ्यांचे समावेशन आश्वासन दिले आहे. १०-२०-३० अश्वसित योजना लागू करून ३१ ऑगस्टपर्यंत आदेश काढण्याचे आश्वासित करण्यात आले असून सहायक अनुदानाची थकबाकी शासनाकडून त्वरीत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य निरीक्षक समावेशन तात्काळ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्रेणी अ व ब सरळसेवा पदस्थापना देण्याच्या आधी कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल, कंत्राटी कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन दिलेच जाईल, न दिल्यास मुख्याधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व इतर मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
त्यानुसार सद्यस्थितीत तुर्तास दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजीपर्यंत कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मोठ्या जोमाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.