मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला 165 जागा मिळणार आहेत. तर सत्ताधारी महायुती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवणार असल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी विरोधातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा पुढे आला आहे. त्यानुसार लोकसभेत जसे यश मिळवले तीच सरासरी विधानसभेतही राखू, असा विश्वास आघाडीतील नेते व्यक्त करत आहेत. आघाडीच्या नेत्यांना 188 जागांचा विश्वास असला, तरी सुमारे 165 जागा नक्कीच जिंकू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी रणनीती आखताना राज्याचे सात भाग केले आहेत. त्यानुसार सध्या नागपूर, अमरावती, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा वरचष्मा आहे.
नागपूर आणि अमरावती विभागात काँग्रेस चांगली कामगिरी करेल. मराठवाडाही युतीसाठी अनुकूल आहे. तेथे काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गटाला चांगला पाठिंबा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पवार गटासाठी पोषक वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील चार प्रदेश महाविकास आघाडीसाठी अनुकूल दिसत आहेत. तर मुंबई, कोकण आणि उत्तर प्रदेशात आघाडीने महायुतीला चांगलेच रोखले आहे. असेत असतानाही विधानसभेत मात्र या भागातून महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. विधासनसभेत आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत.
मुंबईतही भाजप आणि शिवसेनेसमोर महाविकास आघाडी मोठे आव्हान उभे करणार आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जिंकल्या असल्या तरी तिथे काँग्रेस अजूनही कमकुवत दिसत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसपुढे मोठे आव्हान असणार आहे.