• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

झुगरेवाडीतील विद्यार्थी झाले स्मार्ट!

ByEditor

Aug 12, 2024

इंटरॲक्टीव बोर्डवर मुलांचा अभ्यास

प्राथमिक शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची होतेय ओळख

झुगरेवाडी ठरतेय उपक्रमशील शाळा

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यातील अवघड क्षेत्रामध्ये झुगरेवाडी शाळा येते. तर दुर्गम भाग असलेल्या झुगरेवाडी येथे मुलांच्या गुणवत्तेवर भर देण्याचं काम होत असल्याचं चित्र आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हे मेहनत घेत असल्याने रोटरी क्लबच्या मदतीने शाळेत २ इंटरॲक्टीव बोर्ड उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या बोर्डवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची नव्याने ओळख होत अभ्यासाची गोडी देखील लागत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी स्मार्ट झाले असून उपक्रमशील शाळा म्हणून झुगरेवाडी शाळा नावलौकिक टिकवून असल्याचे चित्र आहे.

कर्जत तालुक्याला आदिवासी बहुल तालुका देखील म्हटले जाते. तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात असून आदिवासी समाजाची वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यामध्ये खांडस पट्ट्यातील दुर्गम भागात झुगरेवाडी वसलेली आहे. झुगरेवाडी रायगड जिल्ह्यात येत असून ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. या वाडीत २०० हुन अधिक आदिवासी कुटुंबे राहतात. त्यामुळे झुगरेवाडीला मोठी वाडी म्हणायला बिलकुल हरकत नाही. आजूबाजूला घनदाट जंगल आणि निर्मनुष्य रस्ता. या वाडीत जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. १ ली ते ८ वी अशी शाळा असून शाळेत साधारण १०, १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेवर २०१६  साली रवी काजळे या शिक्षकाची नेमणूक झाली. शाळेत हजर झाल्यावर लगेचच काजळे सरांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

दुर्गम भागातली टोकाची शाळा. दुर्गम भाग म्हणजे इतर वाड्यांप्रमाणे इथेही पाण्याची अत्यंत टंचाई. त्यामुळेच काजळे सरानी शाळेच्या व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. शाळेच्या वर्गखोल्यांची पडझड झालेली होती. त्यामुळे शासनावर विसंबून न राहता त्यांनी ग्रामस्थांना सोबतीला घेतलं आणि अनेक मदतीचे हात पुढे आले त्यातून शाळेचं काम सुरू झालं. वर्ग खोल्या सुस्थितीत आल्या. त्यानंतर गरज होती पाण्याची होती. त्यामुळे सहकार आयुक्त प्रदीप महाजन यांच्यामुळे गीतगुंजन व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून  डोंबिवलीच्या रोटरी क्लबशी संपर्क झाला. आणि त्यांनी बोअर मारून दिली. तर त्यानंतर अनेक उपक्रम राबवत शिक्षक असलेले रवी काजळे यांनी झुगरेवाडी शाळेचे रूप बदलले. याचीच दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला. मात्र त्यानंतर देखील काजळे सर यांचे झुगरेवाडीत मुलांसाठी प्रयत्न हे सुरूच राहिले.

जग आधुनिकतेकडे झुकले आहे. त्यामुळे काळानुरूप शिक्षण पद्धतीत देखील बदल घडत आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये खाजगी शाळांसारखे शिक्षण मिळायला हवे हे देखील महत्वची बाब आहे. त्यामुळे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी याबाबत रोटरी क्लब वरळी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी दोन इंटर ॲक्टिव्ह बोर्ड देण्याचे कबूल करत ते दिले देखील. शाळेत बोर्ड दाखल झाले. नव्या बोर्ड वर मुलांचं शिक्षण सुरू झालं. पण त्यात वांरवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अडसर निर्माण झाला. ग्रामीण भाग असल्याने अखंडित विद्युत पुरवठा मिळणे अवघड होते. यावर मात करण्यासाठी खिशाला हात घालत मुख्याध्यापक रवी काजळे यांनी शाळेत इन्व्हर्टर घेतला. त्यामुळे आता मुलांचं शिक्षण विनाखंडीत सुरू झालं आहे. तर या नव्या बोर्डवर दृकश्राव्याच्या माध्यमातून मुल धडे गिरवत आहेत. अत्याधुनिक माध्यम असल्याने मुलांना याची उत्सुकता आहे. तर स्वतः बोर्डवर धडे गिरवताना विद्यार्थी आनंदी होत आहेत. झुगरेवाडीतील मुख्याध्यापक रवी काजळे, शिक्षक नंदादीप चोपडे, सतीश घावट, राजश्री पाटील हे पारंपरिक फळा सोडून शाळेत इंटर ॲक्टीव बोर्ड वापरत असल्याने मुल देखील स्मार्ट होत आहेत. तर कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात अश्या पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग असल्याने याची चर्चा देखील होत आहे.

एकंदरच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का घसरत आहे. तर ग्रामीण भागात मुलांना शिक्षणासाठी त्रेधा तिरपिट सहन करावी लागते. दुसऱ्या बाजूला खाजगी शाळेत भरमसाठ फी आकारली जाऊन शाळा मनमानी करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळा स्मार्ट होण्याची गरज आहे.

आमच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले असून मी त्यातील प्रमुख आहे. आमच्या शाळेत इंटर ॲक्टीव बोर्ड आणल्यापासून आम्हाला त्याचे आकर्षण होते. मात्र त्यावर नीट अभ्यास करता येत नव्हता कारण लाईट पूर्णवेळ राहत नव्हती. त्यामुळे त्याची उत्सुकता अधिकच वाढली होती. पण आमच्या काजळे सरांनी इन्व्हर्टर बसवून ते बोर्ड सुरू केले. त्यामुळे ही स्मार्ट सुविधा आता आम्हाला शाळेच्या पूर्णवेळत बोर्ड वापरायला मिळत असल्याने इतर विदयार्थी सुद्धा मन लावून अभ्यास करतात. यावर शिकायला आम्हाला खूप मजा वाटते
-नेत्रा पादिर, विद्यार्थिनी

ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षणात खूप हुशार आहेत. त्यांच्यावर मेहनत घेतली तर हे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आम्ही मेहनत घेत असतो. रोटरी क्लब वरळीच्या माध्यमातून मिळालेल्या इंटरॲक्टीव बोर्डमुळे मुलांना शिक्षण अजून सोपे होऊन, तंत्रज्ञानाची ओळख देखील होईल. मुलांच्या बौद्धिक विकासावर आम्ही भर देत आहोत.
-नंदादीप चोपडे, शिक्षक

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!