सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंड, कुंभे परिसरातील स्थानिकांचा रोजगार बुडाला
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून माणगाव उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार माणगांव उपविभागांतर्गत माणगांव तालुक्यातील मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट”, “ताम्हाणी घाट” व कुंभे जलविद्युत प्रकल्पा जवळ आजुबाजूच्या १ कि.मी. परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा नुसार ता. ०५ जुलै २०२४ ते ता. ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी १४४ कलम प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे वर्षासहलीसाठी येणाऱ्या उत्साही पर्यटकांच्या उत्साहावर निरुत्साहाचे पाणी पडले त्यामुळे पर्याटकांनी या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवली असून ती ओसाड पडली आहेत. त्यामुळे या परिसरातील छोटे मोठे उद्योगधंदे करणाऱ्या स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे.
रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट” हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. हि ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वी या परिसरात अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडलेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हीणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जिवीत हानी होऊ शकते. या कारणांमुळे “देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट” व कुंभे ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने मनाई केली आहे. या भागात माणगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या परिसरातील छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक, खानावळ, चहा टपरी व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक, मक्का व्यावसायिक, पर्यटकांच्या निवासाची सोय करणारे व्यावसायिक, फळ व भाजी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक, परिसरातील पर्यटन स्थळाची माहिती देणारे गाईड या व्यावसायावर मोठ्या प्रमाणात परीणाम झाला आहे. त्यामुळे अधीच सुशिक्षित बेरोजगार असणारे गाईड व व्यावसायिकांच्या कुटुंबावर ऐन हंगामात रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच ग्रामपंचायतच्या उत्पन्नात हि पर्यायाने घट झाली आहे. माणगाव तालुक्यातील नैसर्गिक असणाऱ्या या पर्यटन स्थळाला पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा चार महिन्याचा कालावधी उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. अन्यथा पर्यटक या पर्यटन स्थळाकडे इतर दिवशी फिरकत नाहीत. ऐन हंगामात १४४ कलम लागू केल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तर स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे. शासनांनी पर्यटन स्थळे विकसित करून सर्व पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखून सुविधा पुरवल्यास दुर्घटनेला आळा बसेल व स्थानिकांना हि रोजगार मिळवून तालुक्यासह जिल्ह्याचे आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ होवून रायगड आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.