अनैतिक सबंधातून खून झाल्याचा संशय
घन:श्याम कडू
उरण : सतत घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे उरण तालुका प्रकाशझोतात आला आहे. यशश्रीचा दाऊदने केलेला घात अजूनही कोणीच विसरू शकला नाही. अशाच प्रकारची खुनाची घटना जासई परिसरात घडली आहे. सदरचा खून अनैतिक सबंधातून झाल्याचे समजते. या प्रकरणातील संशयितांना उरण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उरण तालुक्यातील जासई गावात दिबा पाटील सभागृह असलेल्या परिसरात एक बेवारस शव सापडले आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भागात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये हा मृतदेह असल्याचे बोलले जाते आहे. ही पिशवी विमल गुटख्याची असल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती. सदरचा मृतदेह हा अज्ञात ४० ते ४५ वर्षाच्या इसमाचा आहे. सदरचा इसम हा सतत दारू पिऊन पत्नी व मुलांना मारहाण करीत असल्याचे तो वास्तव्य करीत असलेल्या आसपासचे रहिवासी सांगतात.
सदरची घटना ही अनैतिक सबंधातून झाल्याचा संशय व्यक्त करून याप्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. लवकरच संबंधित खून अनैतिक सबंधातून का इतर कारणामुळे झाली हे लवकरच उघड होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. उरण पोलीस घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक टीमला दाखल झाली आहे. तपासाअंती काय निष्पन्न होईल, याकडे आता उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे. अशा घटनांत वाढ झाल्याने उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापुढे भाडेकरू ठेवताना घर मालकांनी योग्य ती कागदपत्रे घेऊन याची माहिती संबंधित ग्रामपंचायत अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याला देणे सक्तीचे करावेत. यामुळे अशा घटना घडल्यावर तपास करणे सोयीचे होते. अन्यथा याकडे दुर्लक्ष करणाऱ्या घर मालकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.