प्रतिनिधी
नागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम अमृत महोत्सव वर्षापासून सतत गेले तीन वर्ष सर्व देशभरात राबविण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आनंदीबाई महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात शाळा समिती सदस्य राजूशेठ जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेबाबत जागृती करण्यात आली. या कार्यक्रमात प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. संदेश गुरव, प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. डॉ. विलास जाधवर, प्रा. डॉ. राणी ठाकरे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले व आभार डॉ. विलास जाधवर यांनी मानले.

दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयात ध्वजारोहण महाविद्यालय विकास समिती सदस्य अनिल काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाची बांधिलकी राखण्याची शपथ देण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्यासह उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन करण्यात केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

१५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.४५ वाजता संकुलात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी जोगेश्वरी नगरातून प्रभातफेरी काढली. यावेळी उच्चमाध्यमिक राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सहभाग नोंदवला. गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर अध्यक्ष नरेंद्र जैन यांनी रांगोळी प्रदर्शनाला भेट दिली व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.