रायगड जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग
विठ्ठल ममताबादे
उरण : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी राज्यभरातून सुमारे ४००० वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदानापासून ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा संविधान चौक येथे अडवण्यात आला.

२६ कामगार प्रतिनिधी यांनी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सचिन मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले. राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेसोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जोपर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तोपर्यंत कामगार घरी जाणार नाही असा निर्धार करत कामगारांनी संविधान चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या मोर्चात रायगड जिल्ह्यातील शेकडो कामगार सहभागी झाले होते.
