दुर्घटनेची शक्यता, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष!
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत खांबांना वेली व झाडांनी विळखा घातल्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
महावितरण कंपनी मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्यांकडे काणाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी काही ठिकाणच्या विद्युत खांबांच्या बाजूला वेली व झाडे झूडपे असतात. ती न तोडल्यामुळे अती पावसामुळे मोठया प्रमाणात वाढतात. अशा पद्धतीत गोवे गावाच्या स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एक-दोन विद्युत खांबांना वेली व झाडांनी विळखा घातला आहे. गोवे गावाच्या स्मशानभूमीकडील रस्त्यावरून शेतकरी, गुराखी, रेल्वे कर्मचारी, वाटसरू ये-जा करीत असतात. परंतु, या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विद्युत खांबांना वेलींनी व झाडांनी विळखा घातल्यामुळे अती पावसाच्या ओलाव्यामुळे विज प्रवाह खाली उतरून या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या व प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत खांबांना गुरफटलेल्या वेली व झाडे तोडून विद्युत खांब मोकळा करावा अशी मागणी गोवे ग्रामस्थांकडून केली जात आहे.