गौतम जाधव
इंदापूर : मुंबईतून कोकणात व कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस यांची बसस्थानकात चहा, नाश्ता, जेवणाची सोय असते. तसेच कमीत कमी दर देखील प्रवासी वर्गाकडून घेतले जातात. असे असताना काही एसटी महामंडळाच्या गाड्या अनाधिकृतपणे खासगी हॉटेल व धाब्यांवर थांबत आहेत. या हॉटेल व धाब्यांवर पदार्थाचे दर हे प्रवाशांकडून तिप्पट आकारले जात असल्याने प्रवासी वर्गामधून महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाबद्दल मोठी नाराजी व्यक्त होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधव यांनी प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले,
पुढे बोलताना जाधव यांनी सांगितले की, या हॉटेल व धाब्यांवर पाणी २५ रु., वडापाव २० रु., मिसळपाव ८० रु., जेवण १३० रु., चहा २० रुपये असे भाव असून काही पदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रवासी वर्गाला आढळून आले आहे. या ठिकाणांवर शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशा ठिकाणी प्रवाशांची पाकिट मारी, सामानाची चोरी असे अनेक प्रकार या आधी घडले आहेत व महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उद्भवत आहे.
एसटी चालक व वाहक यांची या धाब्यांवर चांगल्या प्रकारे सोय होते, परंतु सर्वसामान्य प्रवाशांना मात्र नाईलाजाने जास्त पैसे मोजावे लागत आहेत. लांब पल्याच्या एसटी बस गाड्या बसस्थानकात न थांबवता खाजगी धाब्यांवर थांबवल्या जात असून हे सर्व एसटी महामंडळाच्या फायद्यासाठी की कुणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी आहे असा प्रश्न सामान्य प्रवासी वर्गाला पडत असल्याचे सुधाकर जाधव यांनी शेवटी बोलताना सांगितले.