• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्जत तालुक्यात मुक्या जनावरांची शॉक लागून मृत्यू होण्याची मालिका सुरूच

ByEditor

Aug 29, 2024

पेठ अंबिवली येथे विजेचा शॉक लागून दुभत्या म्हशीचा मृत्यू

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यात विजेचा शॉक लागून मुक्या जनावरांचा मृत्यू होणे ही बाब नित्याचीच झाली असुन, तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ अंबिवली येथे एका शेतकऱ्याची दुभती म्हैस ही चरत असताना विजेचा शॉक लागल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशीच घटना ही दि. ४ ऑगस्ट रोजी वंजारवाडी येथे माळरानावर चरत असताना, विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. प्रभाकर चिंतामण पिंपळकर या शेतकऱ्याची म्हैस असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कर्जत तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्यापासून विजेचा शॉक लागून मुक्या जनावरांचा मृत्यू होण्याची मालीका सुरू झाली असुन, तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथे दि. ४ ऑगस्ट रोजी माळरानावर चरत असताना, विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे पेठ अंबिवली येथील प्रभाकर चिंतामण पिंपळकर या शेतकरी यांच्या दुभत्या म्हैशीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपळकर यांनी चारा चरण्यासाठी म्हशीला गोठ्यातून सोडले होते. दरम्यान अंबिवली धामणी रस्त्यावर चारा चरत असताना विद्युत महावितरण कंपनीच्या विजेचा विद्युत वाहक तारेचा शॉक हा म्हशीला लागल्याने म्हशीचा जागेवर मृत्यू झाला आहे. महावितरण कंपनीच्या विद्युत पोलला सपोर्ट म्हणून बांधून ठेवलेली तार याला पावसाच्या पाण्याने करंट प्राप्त झाल्याने तसेच या तारेला येथील हिरव्या झाडाच्या वेळीने गुंडाळून परिसरात झाडांना करंट लागत असल्याने चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. दुभत्या म्हशीचा शॉक लागून मृत्यू झाल्याने मात्र पिंपळकर यांचे लाखो रुपयांचे यामध्ये नुकसान झाले असून, लहानपणापासून वाढवलेली म्हैस अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाकडून देखील शोक व्यक्त करण्यात येत आहे.

विद्युत महावितरण कंपनीचा सुरू असलेल्या या भोंगळ कारभारामुळे आतापर्यंत शेकडो मुकी जनावरे ही मृत्यूमुखी पडली असुन, प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांना तूटपुंजी मदत दिली जाते. तर कधी ती मदत मिळतही नाही. परंतु याच ठिकाणी सदर प्रकार हा मुक्या जनावर बेतला जर या ठिकाणी मनुष्यहानी झाली असती तर आज कदाचीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत राजकारणी पुढाऱ्यांनी राजकारण केले असते. परंतु मुक्या जनावरांसाठी आज कोणीही पुढे आलेला नाही. कोणी अधिकाऱ्यांवर चौकशीची साधी मागणी देखील करण्यात आली नसल्याने तालुक्यात शेकडो जनावरे मेली असली तरी महावितरणच्या सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे मात्र येणाऱ्या काळात हाच आकडा वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या कुटूंबातील सदस्याप्रमाणे वाढवलेल्या या मुक्या जनावरांसाठी कोण देवदूत म्हणून धावणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!