कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ; नगरपरिषदेकडून उपाययोजना नाही
विठ्ठल ममताबादे
उरण : शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून उरणमधील विविध रस्त्यावर, चौकात, नाक्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात कुत्रे उभे असलेले दिसतात. मात्र हे कुत्रे शांत न बसता येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना विनाकारण नाहक त्रास देत आहेत. तर उरण शहरातील अनेक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे. उरण नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे उरण शहरामध्ये नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनेत वाढ होत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
उरण शहरातील देऊळवाडी शंकर मंदिर येथे तसेच कामठा रोड व कामठा परिसर, पालवी हॉस्पिटल परिसर आदी ठिकाणी कुत्रे मोठ्या प्रमाणात असून या कुत्र्यांना पकडून बाहेर कुठेतरी योग्य सुरक्षित स्थळी सोडून देण्यात यावे व कुत्र्यांची नसबंदी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कुत्र्यांची संख्या वाढणार नाही अशी मागणी उरणमधील नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी गुरव यांनीही उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे केली आहे. पत्रव्यवहार व नागरिकांची मागणी या गोष्टींकडे नगरपरिषद कोणत्या भूमिकेतून बघते हे पाहणे महत्वाचे ठरेल. नागरिकांची मागणी व नागरिकांनी केलेले पत्रव्यवहाराची दखल नगरपरिषद घेते की नाही याबाबत नागरिकांच्या नजरा नगरपरिषदेच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. उरण शहरात एखाद्याला कुत्रा चावला आणि त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.