सुरुवातीच्या ५ कोटी ६४ लाखात १४ कोटी ७१ लाख अधिक निधीची मंजूरी
शेतकरी व बागायतदारांना उत्पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार
गणेश प्रभाळे
दिघी : निसर्गाची जोड व उत्पादनला लागणारे पोषक वातावरण असे मिळणारे महाराष्ट्र राज्यातील सुपारी संशोधन केंद्र रायगड मधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे होत आहे. या सुपारी केंद्राला एकूण २० कोटी निधीची मंजूरी प्रशासनाकडून मिळाल्याने केंद्र विस्तारीकरण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी व बागायतदारांना उत्पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहे. दिवेआगरच्या पर्यटन व्यवसायालाही यामुळे चालना मिळणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असणारे सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन शहरातील 43 गुंठे जमिनीवर पसरले असून, या केंद्राची स्थापना जून 1953 साली झाली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी या केंद्राला भेट देत असत. मात्र, अपूर्या जागे मुळे येथील सुपारी व त्यातील आंतरपिके संशोधनाला वाव मिळत नव्हती. विशेष म्हणजे सन 2003 पासून जागेचा शोध सुरु होता.
श्रीवर्धन येथील केंद्रासाठी विस्तारित सुपारी संशोधन केंद्रासाठी दिवेआगर येथील जागा प्रस्तावित होती. मात्र, जागे बाबत स्थानिक वाद असल्याने तेथे संशोधन केंद्र बनवण्याबाबत साशंकता निर्माण झाली. मागील दिवसात ही समस्या सुटल्याने दिवेआगर येथे २ हेक्टर जागेवर केंद्राला उभारणी करण्यात येणार मार्ग मोकळा झाला आहे. सुरुवातीला ५ कोटी ६४ लाख तर आता १४ कोटी ७१ लाख. असे २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत. आता दिवेआगर परिसराचे हवामान आणि जमीन विचारात घेवून अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या पिकाची आंतर पीक पध्दती विकसीत करण्यासाठी संशोधन कार्य केले जाणार आहे.
वैशिष्ठ्यपूर्ण पीक –
नारळ, सुपारी ही महत्वाची पिके व त्यावर संशोधन केले जाते. याशिवाय जायफळ, दालचिन व काळीमिरी तसेच अननस, हळद, आले आणि सुरण यांसारखी आंतरपिके यांवर प्रयोग केले जातात. येथे सुपारीचे रोपटे, नारळाची रोपे यांची विक्री शासकीय दराने होते. श्रीवर्धनी प्रकारच्या सुपारीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
श्रीवर्धनलाच हे सुपारी केंद्र का?
समुद्र किनारपट्टी भागात सुपारी हे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या भागातील स्थानिक सुपारी जातींमधून ‘श्रीवर्धनी रोटा’ पद्धत ही जात 1998 मध्ये केंद्रा कडून विकसित केली गेली. तिच्यात पांढऱ्या गऱ्याचे प्रमाण अधिक असून मऊ असते. संशोधनास पोषक वातावरण व सुपिक जमीन यांमुळे संशोधन केंद्र श्रीवर्धन येथे 1953 साली स्थापन केले गेले. सुपारी पिकांवरील विविध रोग, कोकणातील बागांचे सर्वेक्षण करून विविध जातींचा संग्रह व अभ्यास करणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींचा अभ्यास करणे तसेच रोपे शेतकऱ्यांना पुरवणे ही प्रमुख उद्दिष्ट आहेत.
कसं असणार केंद्र –
सद्यस्थितीत केंद्राच्या दोन हेक्टर क्षेत्राला कंपाऊंड वॉल करण्यात आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभाग अखत्यारीत होणाऱ्या पुढील कामात पाँटिंग शेड, अतिथी गृह, इलेक्ट्रिकल रूम आणि डिजी तसेच मळणी यार्ड असे अनेक सुविधांमध्ये दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
दिवेआगर येथील केंद्राला शासनाकडून प्राप्त निधी नुसार येथे पाण्याची सुविधा मिळून लागवड व नर्सरी करण्यात येईल. या सर्व मुलभूत सुविधा मिळून केंद्र लवकरच कार्यान्वित होईल.
-डॉ. एस. एन.सावंत,
सुपारी संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी.