विश्वास निकम
कोलाड : महाभारतात खेळला गेलेला सारिपाटचा (द्यूत) हा खेळ रोहा तालुक्यातील गोवे तसेच संभे गावात पिढ्यानंपिढ्या सुरु असुन या गावातील तरुणांनी अजूनही हि परंपरा टिकून ठेवली आहे. हा सारिपाटाचा खेळ गणेश उत्सवापासून दसऱ्यापर्यंत रोहा तालुक्यातील गोवे तसेच संभे गावात खेळला जात आहे. या खेळाचे दर्शन लोकांना जय मल्हार मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राला झाले असले तरी आधुनिक काळात असे खेळ कालबाह्य होत असतांना आजही या दोन्ही गावातील तरुणांनी सारीपाटाची परंपरा सुरु ठेवली आहे.
या खेळासाठी कापडी सारिपाट वापरला जात असुन लाकडी सोंगट्यांचा वापर केला जात आहे. लाकडी सोंगट्या कापडी पटावर मांडून हा खेळ सुरु होतो. फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे खेळाडू कवड्यांचे दान घेतो, त्या दानानुसार सोंगटी पटावर चालवली जाते. हा खेळ दोन गटात खेळला जात असल्यामुळे ज्या गटाच्या सोंगट्या मध्यभागी जातील तो गट विजयी होतो. एका गटाने सोंगटी मारल्यानंतर दुसऱ्या विरोधी गटानी सोंगटी मारली तर खेळ बरोबरीत सुटतो.
या खेळाचा डाव पूर्ण होण्यासाठी साधारण चार तास लागतात, त्यामुळे पूर्ण जागरणासाठी दोन ते तीन डाव होतात विशेष म्हणजे या खेळात पैशाचा वापर केला जात नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एक जागरण म्हणून गणपती उत्सवात हा खेळ खेळला जात आहे.
पूर्वी सरीपाटच्या खेळात जागरण म्हणून तरुण वर्गाचा सहभाग असायचा. सध्या मात्र बाल्या नाच, महिलांचे खेळ, याप्रमाणे सारिपाट खेळाकडे तरुणांनी पाठ फिरवली असून फक्त जागरण म्हणून जुगार खेळून जागरण होईल असेच तरुण वर्गाला वाटत असुन यामुळे लाखो तरुण कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत होतात. असले खेळ खेळण्यापेक्षा गोवे तसेच संभे गावातील तरुणांप्रमाणे या परंपारीक खेळाकडे वळावे, यामुळे जागरण पण होईल व पैसाही वाया जाणार नाही.
-डॉ. मंगेश सानप
सामाजिक कार्यकर्ते
