एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; १५ दिवसांत परताव्याचे दिले होते आमिष
उरण | विठ्ठल ममताबादे
तालुक्यात चिटफंड घोटाळ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता सारडे गावातील ग्रामस्थांना तब्बल ३ कोटी ३० लाख ६६ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या १५ ते २० दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील तिघांनी १७ गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून, याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे होते फसवणुकीचे जाळे
मिळालेल्या माहितीनुसार, सारडे गावातील रहिवासी आरोपी प्रवीण पाटील (४६), विनायक पाटील (४३) आणि कमिक्षा पाटील (३७) यांनी वर्षभरापूर्वी एक अनधिकृत गुंतवणूक योजना सुरू केली होती. “एका आयडीसाठी ११,००० रुपये गुंतवा आणि १५ दिवसांनंतर १९,००० रुपये परतावा मिळवा,” असे प्रलोभन त्यांनी ग्रामस्थांना दाखवले होते.
सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा देऊन आरोपींनी विश्वास संपादन केला. त्यानंतर गावातील अनेक जणांनी कर्ज काढून किंवा साठवलेली पुंजी या योजनेत गुंतवली. एका मुख्य तक्रारदाराने एकट्याने २६ लाख ७ हजार रुपये (२३७ आयडी) गुंतवले होते, तर इतर १७ प्रमुख गुंतवणूकदारांनी मिळून एकूण २,७६९ आयडींमार्फत मोठी रक्कम जमा केली होती.
घराला कुलूप लावून आरोपी फरार
गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर जेव्हा ग्रामस्थांनी आपल्या मूळ रकमेसह परताव्याची मागणी केली, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. संशय आल्याने गुंतवणूकदार त्यांच्या घरी गेले असता, आरोपी आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार झाल्याचे समजले. अनेक दिवस संपर्क न झाल्याने अखेर फसवणूक झालेल्या ग्रामस्थांनी उरण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
नागरिकांनी बोध घेण्याची गरज
उरण परिसरात वारंवार चिटफंड घोटाळे होऊनही नागरिक अशा भूलथापांना बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. “जादा परताव्याच्या हव्यासापोटी कष्टाची कमाई अशा अनधिकृत योजनांमध्ये गुंतवू नका,” असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. आता या प्रकरणात विविध शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन जनजागृती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
