विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार
मिलिंद माने
मुंबई : सन २०२४ च्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत. या निवडणुका निःपक्षपाती पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संवेदनशील क्षेत्र व निवडणुकी संदर्भात घ्यावयाचा आढावा यासाठी केंद्रातील निवडणूक आयोग २७ व २८ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून त्याआधी राज्यातील विधानसभेची निवडणूक होणार असल्याने राज्यातील राज्य निवडणूक आयोग त्या दृष्टीने कामाला लागला असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्यावत करण्यापासून निवडणुकीसाठी लागणारे शासकीय, निम शासकीय कर्मचारी त्याचबरोबर पोलीस यंत्रणा, होमगार्ड व निवडणुकीसाठी लागणारी मतदान केंद्र, त्यासाठी लागणारी वाहने, मतपेट्या पोहोचवण्यासाठी व मतदान केंद्रातून मतदान झाल्यानंतर मतमोजणी केंद्रापर्यंत लागणारी वाहने किती याची परिपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने मतदार संघनिहाय संकलित केली आहे.
राज्यात २७ व २८ सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्याच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते राज्यातील राज्य निवडणूक आयोग, राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, मुंबई पोलीस आयुक्त, महसूल आयुक्त, परिवहन आयुक्त, होमगार्डचे महासंचालक यांच्यासह राज्यातील सहा विभागातील सहा विभागीय आयुक्त यांच्याशी ते बैठका घेतील. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा अथवा गरज पडल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईत पाचारण करतील व त्यांच्याकडून मतदान केंद्रनिहाय आढावा घेतील. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्याच्या दौऱ्यावरून परत गेल्यानंतर साधारणतः आठ दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर करण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांकडून वर्तवली जात आहे.
निवडणुका दोन टप्प्यात कि एका टप्प्यात?
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूका या किती टप्प्यात होणार याबाबत सर्वच पक्षात उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. सत्ताधारी पक्षाने पाच टप्प्यात राज्यातील निवडणुका घेण्यास सांगितले होते, मात्र त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोध दर्शविला असून निवडणुका झाल्या तर त्या दोन टप्प्यात होतील अन्यथा एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील निवडणुका पार पाडण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात नेत्यांना प्राप्त झाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात राज्यातील निवडणुका घेण्याचे ठरवल्यास १३ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर २०२४ असे दोन टप्पे करण्याचे ठरवले आहे. १३ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाल्यानंतर एक दिवस सुट्टी दिली जाते. १५ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक १६ नोव्हेंबर रोजी घेतली जाऊ शकते. तर २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागण्याचे संकेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्राप्त होत आहेत. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका घ्यावयाचे ठरल्यास १६ नोव्हेंबर रोजी राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणुका पार पडतील.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र जवळील गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातून अतिरिक्त पोलीस बळ व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या यांच्यासह पुरेसे निवडणुकीसाठी आवश्यक असणारे प्रशासकीय अधिकारी उपलब्ध करू शकते. याबाबत सत्ताधारी पक्ष तयार असल्याचे खाजगीत सांगण्यात येत आहे. कारण एकाच टप्प्यात निवडणुका झाल्यास पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील वातावरणाचा परिणाम दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघावर होऊ शकतो. त्यामुळे अशी कोणतीही चूक सत्ताधारी करणार नसल्याचे समजते. त्यामुळे राज्यात साधारणतः एकाच टप्प्यात निवडणुका होण्याचे संकेत आता प्राप्त होत असले तरी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतरच राज्यातील मतदान किती टप्प्यात होणार हे स्पष्ट होणार आहे.
Hi