मुंबई : महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केल जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील.
दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का?
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता.
या योजनेसाठी जॉइंट अकाऊंट चालेल का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉइंट अकाऊंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता.
आता अर्ज केला तर एकत्रित तीन हप्ते मिळणार की एकच हप्ता मिळणार?
ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात. मात्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच याबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मंत्रि आदिती तटकरे यांनी केलं आहे.