• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार; चित्रलेखा पाटील यांचा विश्‍वास

ByEditor

Sep 28, 2024

अमुलकुमार जैन
रायगड :
निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालविण्याचा प्रकार घडतो. त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतो. दारुमुळे कुटूंब उध्वस्त होतात. दारुचे व्यसन लावून चिखलात लोळवणार्‍यांना महिलाच त्यांची जागा दाखविणार आहेत. पाणी, रस्त्याचा प्रश्‍न गंभीर आहे. पण ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचे काम आमदार करतात. हे आपल्याला थांबवायचे आहे, असा आरोप करीत चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या, पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार आहेत. महिलांची एकजूट एक वेगळी क्रांती घडविणार असा विश्‍वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबाची’ अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन सहाण बायपास येथील पांडूरंग मानकर यांच्या श्रीगणेश मंगल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि.27) करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी सदस्या तथा रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, संजना कीर, पंचायत समितीच्या माजी सदस्या अश्‍लेषा नाईक, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, शेकाप कामगार राज्य समितीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, सौंदर्या पोईलकर, विद्या मगर, लहानी नाईक, रेखा मगर, पुनम वर्तक आदी मान्यवरांसह महिला बचत गट फेडरेशनचे पदाधिकारी, सभासद, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या व सहाण, कावीर, बामणगाव, खानाव, आक्षी, ढवर, नवेदर बेली, बेलकडे, रेवदंडा, नागाव, चौलमधील असंख्य महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या, आज संवाद मेळाव्याच्या निमित्ताने इतका मोठा जनसागर बघून खर्‍या अर्थाने आनंद वाटला. शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणार्‍या या समुहातून एक वेगळी उर्जा मिळाली. डावा व पुरोगामी विचारांचा पक्ष नेहमी महिलांना समान हक्क देणारा आहे. महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे. महिला सक्षम बनल्या पाहिजे. त्यांना चुल व मुल या पलिकडे ही जगता आले पाहिजे. त्या स्वालंबी झाल्या पाहिजे ही भुमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांची आहे. परंतु आजही आपल्या समाजात स्त्री – पुरुष समानता दिसून येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. महिलांसाठी समाज व्यवस्थेचे वातावरण पोषक नाही ही मोठी चिंतेची बाब आहे.

महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्या घराबरोबरच देश, राज्य, जिल्हा तालुका, ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमपणे चालवू शकतात. माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या थोर व्यक्तीमत्वांचे विचार त्यांच्या पर्यंत पोहचविण्याची गरज आहे.
शेतकरी कामगार पक्षाने अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. कोविडसह अन्य आपत्तीच्या काळात गोरगरीबांसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये नेत्र तपासणीपासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया, मुली शिकल्या पाहिजे या भूमिकेतून काम करताना त्यांच्यासाठी सायकली वाटप केल्या आहेत.
सरकारने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये दिले. पण दुसर्‍या बाजूला सिलेंडरसह अन्य वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. निवडणुका समोर ठेवून अमिष दाखविण्याचे काम सरकार करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. महिला, तरुणींवर अत्याचार होत असताना त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीचे इनक्वाऊटर करू पोलिसांनी एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना खर्‍या अर्थाने सलाम केला जात आहे. महिला, मुलींची छेड काढणार्‍या त्यांचा जीव घेणार्‍यांनादेखील अशीच शिक्षा झाली पाहिजे. अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी गाव, तालुका पातळीवर महिलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी महिला आघाडी अधिक मजबूत करण्याचा मानस आहे. महिलांनी ठामपणे उभे राहून या विकृतीविरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे. पुढचा काळ हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे. आगामी काळात येणार्‍या कंपन्यांनी शेतकर्‍यांना योग्य भाव दिला पाहिजे. स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे. जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत. विशेष म्हणजे उसर भागात गेल कंपनी आहे. या कंपनीने स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र खुले केले पाहिजे ही आपली प्रामुख्याने मागणी आहे.
अलिबाग हे पर्यटनाचे प्रमुख क्षेत्र आहे. आक्षी, नागाव, मुरूड, रेवस, किहीम मांडवा या भागात मोठ्या प्रमाणात कॉटेज आहेत. या भागात मासेमारी करणारा देखील वर्ग मोठया प्रमाणात आहे. पर्यटनातून महिलांना चांगले रोजगार मिळावे यासाठी प्रशिक्षण देण्याचा एक मानस आहे. मच्छीमार महिलांना उभारी देण्यासाठी खंबीरपणे काम करण्याची गरज आहे.

शेकाप हा गोरगरीबांना केंद्रबिंदू ठेवून काम करणारा पक्ष आहे. शेवटच्या घटकाच्या न्याय हक्कासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे शेकाप कधीही विरोधकांच्या टीकेला घाबरत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार होते. परंतु विरोधकांनी निवडणूकीचे कारण दाखवून भरतीला स्थगिती आणून बेरोजगारांच्या पोटावर पाय दिला आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही आपली भुमिका आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारीदेखील आहे. आपण केलेल्या कामांवर कायमच टीका करीत आला आहे. या टीकांना कधीही भिक घालत नाही. कारण विरोधकांनी मुलींसाठी सायकली वाटप करून दाखवा, गरीबांना घरकूल द्या. नोकर्‍या, रोजगार खुले करून दाखवा असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी विरोधकांना दिला.

मिनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, रायगडच्या रणरागिणी, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने मिनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. त्यांच्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील तीसहून अधिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकारी, बँकीग, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

आता विरोधकांना तालावर नाचविण्याची वेळ आली आहे -अ‍ॅड. मानसी म्हात्रे

आम्हाला दीड हजार रुपये देण्याऐवजी वर्षाचे 365 दिवस रोजगार द्या. राज्यात 288 आमदार आहेत. त्यापैकी 24 महिला आमदारांचा समावेश आहे. ही खेदाची बाब आहे. विधानसभेत आमचा विचार कधी करणार असा सवाल उपस्थित करीत अ‍ॅड. मानसी म्हात्रे म्हणाल्या, महिला शक्ती काय आहे, हे आता विरोधकांना ताळावर नाचविण्याची वेळ आली आहे अशी टीका शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केली.

अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी मी सुरक्षित आहे, मी स्वयंपूर्ण होणार, मी सक्षम होणार हे या मेळाव्यातून घेऊन महिलांनी प्रवास करायचा आहे. हा एल्गार बचत गटाचा आहे. महिलांचा आवाज पोहचू द्या. बहिणीबद्दल सहानभुती असेल, तर महिलांना प्रतिनिधीत्व द्या, असा टोला सरकारला लगावला. आज अलिबागसह मुरूड, आक्षी, नागाव या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनातून रोजगाराचे साधन खुले करण्याबरोबरच बाजारपेठ निर्मितीची व्यवस्था नाही. त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विधी मंडळात लोक प्रतिनिधीच्या रुपाने महिलांचा आवाज जाणे गरजेचे आहे. तरच सर्वसामान्य महिलांचा आवाज पोहचेल. महिला स्वावलंबी व सुरक्षित ठेवण्यासाठी महिलांनी एकजूट होणे आवश्यक आहे. बचत गटांचे संघटन वाढवायचे आहे. अप्रवृतीविरोधात चर्चा होणे आवश्यक आहे. महिला, तरुणींना स्वरक्षणाचे धडे मिळाले पाहिजे, त्या पध्दतीने काम करायला पाहिजे. असे मानसी म्हात्रे म्हणाल्या.

उद्याच्या भविष्याची दोरी महिलांच्या हाती -वैशाली पाटील

रायगड ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांनी या भूमीत इतिहास घडविला आहे. कुळ कायद्याची चळवळ, आंदोलन, कंपनीविरोधात संघर्ष करणारा या जिल्हयाचा इतिहास आहे. चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले आहे. आता धाडसाने बोलण्याची वेळ आली आहे. जिल्हयात 55 ते 60 टक्के मतदान होते. त्यामध्ये महिला मतदानाचा टक्का अव्वल आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्याची दोरी आणि चावी महिलांच्या हाती असणार आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, आम्हाला एकदा पंधराशे रुपये देण्यापेक्षा गेल कंपनीत नोकरी द्या. आमच्या मुलांना रोजगाराचे दालन खुले करा. कंपनीला आवश्यक असलेल्या रोजगाराचे प्रशिक्षण घ्या. या भागात पर्यटन वाढीसाठी चालना आहे. महिलांना यातून रोजगार व उत्पन्न वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. घरापासून विकासाच्या निर्णय प्रक्रीयेत महिलांना सहभागी करून घ्या. महिला सक्षम होण्यासाठी शेतीबरोबरच मासळी विक्रीच्या उद्योगात महिलांना सक्रीय करून घ्या. तरच महिला सबळ होतील असे वैशाली पाटील यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!