घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी पनवेल उरण ‘लॉरी चालक मालक संघटना’ आक्रमक झाली आहे. आज त्यांनी कंपनीच्या गेटवर येऊन प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे, अन्यथा येत्या ३० सप्टेंबरपासून कंपनीच्या गेटवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

करंजा इन्फ्रा कंपनीमधील ट्रान्सपोर्टचे काम ठेकेदार बाहेरील ट्रान्सपोर्टरकडून करून घेत असल्याने येथील स्थानिकाना काम मिळत नसल्याचा ठपका ठेवत, येथील पोर्टमधील कोळसा वाहतूक करण्याचे काम स्थानिक ट्रान्सपोर्टना मिळाले पाहिजे अशी मागणी आज पनवेल उरण तालुका लॉरी चालक मालक संघटनेनी केली आहे. याबाबत कंपनी प्रशासना बरोबर स्थानिक लॉरी चालक मालक संघटनेने वारंवार संपर्क साधून मालाची वाहतूक करण्याचे काम येथील स्थानिकांना मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु याला कंपनी प्रशासन जुमानत नाहो. यामुळे पनवेल उरण लॉरी चालक मालक संघटनेत संतापाची लाट पसरली होती. या विरोधात लॉरी चालक मालक संघटनेने आज करंजा इन्फ्रा कंपनीच्या गेटवरच पत्रकार परिषदेचे आयोजन करणे आले होते.
पत्रकार परिषदेमध्ये येथील लॉरी चालक मालक संघटनेला कंपनी प्रशासनाने सामावून घेण्याची मागणी लावून धरली. जर का येत्या दोन दिवसांत न्याय मिळाला नाहीतर येत्या सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी कंपनीच्या गेटसमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रमाणे शांततेत न्याय मिळत नसेल तर तीव्र आंदोलनाचा इशारा उपस्थितांनी मार्गदर्शन करताना दिला. यावेळी लोकनेते दि. बा. पाटील यांचा विजय असो, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय रहाणार नाही, स्थानिकांना रोजगार मिळायलाच पाहिजे, परप्रतियांच्या गाड्या बंद करा अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. पत्रकार परिषद बंदराच्या प्रवेशद्वारावर घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत, नरेश घरत, पंडित घरत, सुहास घरत, रमाकांत म्हात्रे, सुनील घरत, भगवान तांडेल, विजय नाईक, हरेश म्हात्रे, गणेश नाईक, अविनाश म्हात्रे, विनय घरत आदींसह तालुक्यातील सर्व ट्रान्सपोर्ट कंपनीचे व लॉरी चालक मालक संघटनेचे चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.